Solapur, 26 April : मोठ्या इर्ष्येने एकमेकांना आव्हान देणाऱ्या भाजप नेत्यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन लढणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना भाजपमधील माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येऊन 'चॅलेंज' दिले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात कमालीची चुरशीची झाल्याचे दिसून येत आहे. धोका नको; म्हणून हक्काच्या मतदारांनाही लक्ष्मीदर्शन घडविण्याचे कर्तव्य नेतेमंडळींनी इमानेइतबारे निभावल्याची खुमासदार चर्चा रंगली आहे. त्यातूनच सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या ग्रामपंचात मतदाराचा दहा ते पंधरा हजारापर्यंत भाव फुटल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांना सोबत घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक (Solapur Bazar Samiti Election) लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, काँग्रेससोबत जाणे मान्य नाही, अशी घोषणा करून आमदार सुभाष देशमुख यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी बाजार समितीची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. पण पुढे सुभाष देशमुखांनी काँग्रेस नेत्यांचीच जुळवाजुळव केल्याचे दिसून आले. बड्या नेत्याच्या सूचनेनंतर मोठा फौजफाटा देशमुखांच्या दिमतीला आल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेस नेत्यांना हाताशी धरून कल्याणशेट्टींनी रचलेल्या सापळ्यात आपल्याच राजकीय वर्चस्वाला सुरुंग लाण्याची शक्यता लक्षात घेऊन एरवी कधीही एकत्र न येणारे विजयकुमार देशमुखांनी सुभाषबापूंना (Subhash Deshmukh) टाळी दिली आणि कधी नाही तेवढी सुभाषबापू आणि विजयमालकांची गट्टी जमली. पॅनेलमधून डावलल्यामुळे इरेला पेटलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठेंनी देशमुखांना खंबीर साथ दिली आहे.
सुभाष देशमुखांनी बाजार समितीच्या निवडणुकीतून चिरंजीवाच्या राजकीय इनिंगचा श्रीगणेशा करण्याचे ठरविले आहे. सोसायटी मतदारसंघातील विरोधकांची भरभक्कम तटंबदी पाहून देशमुखांनी मुलाला ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अखंड गतीतून सार्थकता या बीद्रवाक्याप्रमाणे सुभाषबापूंनी मुलाच्या बाजार समिती प्रवेशाची मनीषा पूर्ण करण्याची पुरेपर काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंंकडून मतदारांना लक्ष्मीदर्शन घडवल्याची मोठी चर्चा रंगली आहे. विशेषत: ग्रामपंचायत मतदारसंघातच नेतेमंडळींनी मोठ्या प्रमाणात हात सैल सोडल्याचे सांगितले जात आहे. मतदारांना खूश करण्यासाठी मर्जीतील लोकांकडून जबरदस्त फिल्डिंग लावण्याचे काम दोन्ही बाजूंकडून झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच मतदारसंघातील एका मतसाठी दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंतचा भाव फुटल्याची चर्चा आहे.
सोसायटी मतदारसंघाचा भरभक्कम गड असूनही सत्ताधाऱ्यांनी धोका नको म्हणून त्याही मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत ‘क्रॉसिंग वोटिंग’ची शक्यता बळावली आहे. मात्र वोट कटवाकटवीत नेमका गेम कोणाचा होणार, याची उत्सुकता मात्र वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.