Kolhapur News : कोल्हापूर शहराची हद्दवाढ कधी होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच हद्दवाढीला ग्रामीण भागाचा होत असलेला विरोध पाहून 42 गावांना विशेष प्राधिकरणाचा दर्जा द्यावा अशी मागणी, करवीरचे आमदार चंद्रदीप नरके केली होती. ही मागणी मान्य झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमनानुसार कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा देण्याबाबत मान्यता दिली आहे. त्याचवेळी हद्दवाढ करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांना हद्दवाढ होणार की? याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोल्हापूर शहरालगतच्या ४२ गावांचा संतुलित आणि नियोजित विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी प्राधिकरणाची स्थापन केली होती. यामध्ये, करवीर तालुक्यातील ३७ आणि हातकणंगले तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. मात्र, प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर अनेक वर्षे अपेक्षित विकासकामांना गती मिळाली नाही. २०११ च्या जनगणनेनुसार या ४२ गावांची एकत्रित लोकसंख्या सुमारे तीन लाख सात हजार ४७० इतकी आहे. वाढती लोकसंख्या, नागरीकरणाचा वेग आणि मूलभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र आणि सक्षम विकास यंत्रणा आवश्यक होती.
प्राधिकरणात असणाऱ्या गावांच्या उत्पन्नातूनच विकासकामे करण्याची तरतूद होते. यातून अपेक्षित पायाभूत सुविधा उभारण्यात अनेक मर्यादा येत होत्या. त्यामुळे कोल्हापूर प्राधिकरणाला नाशिक, पुणे, पिंपरी-चिचवड विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यास शासनाच्या नगरविकास विभागाकडून व केंद्र शासनाकडून रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, नियोजनबद्ध निवासी आणि व्यावसायिक विकास, तसेच भविष्यातील पायाभूत सुविधांसाठी अधिक प्रभावी नियोजन शक्य होणार होते. त्यानुसार राज्य शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली.
या प्राधिकरणामध्ये पाडळी खुर्द, शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, वडणगे, शिये, वळीवडे, गांधीनगर, चिंचवाड, मुडशिंगी, सरनोबतवाडी, तामगाव, नेलीं, गोकुळ शिरगाव (एमआयडीसी क्षेत्र वगळून), कणेरी, कंदलगाव, पाचगाव, भुये, निगवे दुमाला, मोरेवाडी, सादळे, मादळे, जठारवाडी, उचगाव, नवे बालिंगे यांसह अनेक गावांचा समावेश आहे. हातकणंगले तालुक्यातील टोप, कासारवाडी, संभापूर, नागाव आणि शिरोली (एमआयडीसी क्षेत्र वगळून) या गावांसह इतर गावांचा समावेश आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर शहरालगतच्या गावांच्या भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार कि नाही? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. ग्रामीण भागाचा होत असलेला विरोध, राजकीय इच्छाशक्तीचा आभाव, स्वतःच्या राजकारणासाठी घेतलेली सोयीस्कर भूमिका, जनगणना यावर शहराची हद्दवाढ रखडली आहे. ही हद्दवाढ व्हावी अशी मागणी कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली होती. क्षीरसागर यांनी त्यांचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद पणाला लावून एकनाश शिंदे यांना बंडात साथ दिली होती. त्यानंतरही आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे. त्यामुळे शहराच्या हद्दवाढीचे काय होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
शहराशेजारील १५ किलोमीटरच्या आसपास ४२ गावांना विशेष प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या गावांमध्ये विकासासाठी निधी आणता येणे शक्य होणार आहे. सध्या महा[पालिकेवर मर्यादा आहेत. पण या प्राधिकरणामुळे गावाच्या मूलभूत गरज सोडवता येईल. त्यांना विश्वास वाटला तर तेही भविष्यात हद्दवाढीत येण्याचा निर्णय ते घेतील, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.