Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur News : शरद पवार गटाचा मोठा नेता अडचणीत; अभिजित पाटलांसह २१ संचालकांविरोधात राज्य बॅंकेची तक्रार

Vijaykumar Dudhale

Solapur News : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि त्यांच्या २१ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार राज्य सहकारी बॅंकेने (शिखर बॅंक) पंढरपूर ग्रामीण पोलिसांत दिली आहे. (File a case against 21 directors including Abhijit Patil; State Bank Complaint)

राज्य सहकारी बॅंकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण ४३० काेटी रुपये थकवल्याप्रकरणी ही तक्रार बॅंकेने दिली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील हे चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्य सहकारी बॅंकेच्या तक्रारीनंतर अभिजित पाटील आणि सहकारी कोणता निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य सहकारी बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक व्यवस्थापक कैलास घनवट यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि त्यांच्या संचालकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला इथेनॉल आणि सहवीजनिर्मितीसाठी कर्ज मंजूर करून उचल दिलेली आहे. त्यापोटी बॅंकेकडे कारखान्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता गहाण ठेवण्यात आली आहे. तसेच, ऊस गाळपातून तयार होणारी साखर आणि इतर उत्पादनेही बॅंकेकडे ताबेगहाण आहेत, त्यामुळे कारखान्याच्या या मालमत्तेवर राज्य सहकारी बॅंकेचा पहिला अधिकार आहे, असा दावा घनवट यांनी पत्रात केला आहे.

वेळोवेळी सूचना करूनही विठ्ठल सहकारी साखर कारखाना प्रशासनाने बॅंकेची कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज भरलेले नाही. त्यामुळे कारखान्याचे हे खाते ‘एनपीए’मध्ये निघाले आहे. बॅंकेने कारखान्याला २३ सप्टेंबर २०१९ रोजी नोटीस दिली हेाती. मात्र, कारखान्याने कर्ज न भरल्याने ३१ डिसेंबर २०२३ अखेर २५२.४९ कोटी मुद्दल आणि त्यावरील व्याज १७७.६८ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे.

कारखान्याने उत्पादीत केलेल्या साखरेवरही प्रथम हक्क बॅंकेचा होता. साखर विक्री करण्यापूर्वी कारखान्याने प्रतिक्विंटल ८०० रुपये कर्जखात्यात बंधनकारक होते. कारखान्याने २०२२-२३ या हंगामात ६६४४२० क्विंटल साखर उत्पादन केली आहे. प्रतिक्विंटल ८०० रुपयांप्रमाणे ५३.५१ कोटी रुपये बॅंकेत भरणे आवश्यक होते. तसेच कारखान्याने उत्पादीत केलेली वीज आणि इथेनॉलही बॅंकेच्या परवानगीशिवाय परस्पर विक्री केले आहे. मात्र, बॅंकेच्या खात्यात कोणत्याही रकमेचा भरणा करण्यात आलेला नाही.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि त्यांच्या संचालकांना बॅंकेशी झालेल्या कराराची संपूर्ण माहिती आहे. कारखान्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या निर्णयास सर्व संचालक जबाबदार असतात. त्यामुळे कारखान्याची उत्पादने राज्य सहकारी बॅंकेच्या परवानगीशिवाय विक्री करून फसवणूक केली आहे. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील अणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राज्य सहकारी बॅंकेचे सहायक व्यवस्थापक कैलास घनवट यांनी केली आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पाटील आणि संचालकांवर कलम ४०२,४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४ आणि कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही घनवट यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT