पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : 'कोरेसाहेब, बड्या धेंडांना तिकिटं; मग कार्यकर्त्यांनी काय करायचे?....बंटीसाहेब ‘पीए’ला आवरा'

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) शेती उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत अनेक मतदारांनी चिठ्ठ्या लिहून नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. ‘चंद्रकांतदादा (Chandrakant Patil), बाजार समितीत भाजपचे उमेदवार कुठे आहेत?’, ‘कोरेसाहेब (Vinay Kore) बड्या धेंडांना बाजार समितीत तिकीट द्या, पदही त्यांना देताय, मग दररोज तुमच्या दारात येणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय करायचे?’, ‘बंटीसाहेब (Satej Patil), तुमच्या ‘पीए’चा एक भाचा साखर कारखान्यात पर्मनंट, दुसरा भाचा कोट्यवधींची कामे घेतो, मेव्हणा बँकेत आहे, याला आवर घाला’ अशा भावना मतदारांनी मतपत्रिकेसोबत चिठ्ठी लिहून व्यक्त केल्या आहेत. (Funny Letter for Kolhapur bazar samiti Election)

कोल्हापुरातील निवडणूक नेहमीच हटक्य असतात. अनेकदा आघाडी आणि युतीच्या बड्या नेत्यांचा आदेश असूनसुद्धा कोल्हापुरातील नेते एकमेकांचा हिशेब चुकता करण्यासाठी अनेक खेळ्या करत असतात. येथील नेत्यांचं आमचं ठरलंय तर अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं आहे. जसे नेते, तसे येथील कार्यकर्ते आणि मतदारसुद्धा आहेत. ज्या प्रमाणे येथील नेत्यांचं ठरतं, तसं येथील मतदारही नेत्यांना खडे बोल सुनावण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मनमानी पद्धतीने वागणाऱ्या आणि कार्यकर्त्यांना विचारात न घेणाऱ्या नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यात त्यांनी एकाही नेत्याला सोडले नाही. सतेज पाटलांपासून विनय कोरेंपर्यंत सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम या मतदारांनी केले आहे.

कोल्हापूर शेती बाजार समितीत एकाच पॅनेलमध्ये दोघेजण असणारे आमदार प्रकाश आबिटकर गद्दार की माजी आमदार के. पी. पाटील गद्दार’, असा कडक सवाल एका मतदाराने विचारला आहे. ‘नेत्यांनो, सग्यासोयऱ्यांऐवजी बाजार समितीत शेतकऱ्यांच्या पोरांना नोकरी द्या. तुम्हीच सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, बाजार समिती, दूध संघात घरच्यांनाच तिकीट देता. तुम्ही मोठ्या पदासाठी सोयीचे राजकारण करता. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.’

एका चिठ्ठीत म्हटले आहे, ‘कोरेसाहेब आपण एक स्वच्छ प्रतिमा असणारे राजकीय व्यक्तिमत्त्‍व आहात. पण, आपण प्रत्येक निवडणुकीत भूमिका बदलणारे अशी तुमची प्रतिमा बनली आहे. त्यामुळे तुमच्याबाबत असणारा विश्वास लोकांच्यात राहिलेला नाही. राजाराम कारखान्याला ज्यांच्या सोबत तुम्ही होता, त्यांना तुम्हीच आता विरोध करताय. तुमची भूमिका नेमकी कोणती?’

आमदार सतेज पाटील यांना उद्देशून चिठ्ठीत म्हटले आहे, ‘बंटी साहेब आणि ऋतुराज दादा मी तुमचा कार्यकर्ता आहे. मला तुमच्या कामाबद्दल आधार आहे. परंतु, दोन नंबर फळी आहे ती बरोबर नाही. पीए हे सुद्धा बरोबर नाहीत. चहापेक्षा किटली गरम आहे. दक्षिण मतदारसंघातील आपले कारभारी बाबासाहेब चौगुले व शशिकांत खोत यांचा वाढता हस्तक्षेप थांबवा.

‘अन्नदात्या शेतकऱ्याचे मनोगत’ म्हणून एक चिठ्ठी निघाली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘नेता कसा असावा, एका पक्षाशी तो एकनिष्ठ असावा आणि ज्या आघाडीत तो निवडून आला, त्या आघाडीत राहणारा असावा. तो गुवाहाटीला जाणारा नसावा. ईडीचे राजकारण करण्यापेक्षा अन्नदाता शेतकऱ्यांच्या विकासाची कामे करा. शेतकऱ्याची गुऱ्हाळे घरे बंद पडत आहेत, त्यासाठी उपाय करावेत. पीक वाढीसाठी त्याला बांधावर जाऊन सल्ला द्या आणि त्याला जिवंत ठेवावा. तसेच, अन्नदात्याच्या मुलांचे लग्न होत नाही, त्यासाठी उपाय करावा, ही विनंती.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT