Bhagirath Bhalke
Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मी भारतनानांचा बछडा; एवढ्या सहजासहजी मैदान सोडणार नाही

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : कितीही अडचणी येऊद्यात, त्यावर मात करण्याचे माझे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मी भारतनानांचा बछडा आहे, एवढ्या सहजासहजी मैदान सोडणार नाही. या सध्याच्या संकटावर निश्चितपणे मात करणारच, असा विश्वास श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी व्यक्त केला. (I am son of Bharatnana Bhalke; Will not leave the field easily: Bhagirath Bhalke)

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे आयोजित करण्यात आलेल्या आदरांजलीच्या कार्यक्रमात भगिरथ भालके बोलत होते. मैदान सोडणार नसल्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे तालुक्यात राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. गेल्या गाळप हंगामातील उसाची एफआरपी आणि कामगारांचे वेतन न दिल्याने विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. आर्थिक अडचणीमुळे चालू हंगाम तो सुरूही होऊ शकला नाही.

एकीकडे कारखाना अडचणीत असताना दुसरीकडे अध्यक्ष भगिरथ भालके हेही नॉटरिचेबल होते. कारखाना सुरू करण्याबाबत आणि थकीत एफआरपी देण्याबाबत त्यांच्याकडून कोणतेही भाष्य होत नव्हते, त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. शिवाय पक्षाच्या बैठकांनाही ते उपस्थित राहत नव्हते. या सर्व प्रकरामुळे त्यांच्यावर सोशल मीडिया, विरोधकांसह पक्षांतर्गतही टीका होत होती. मात्र, भगिरथ भालके यांनी कोणालाही उत्तर दिले नव्हते. कुठल्याही वादावर प्रतिक्रिया न देता ते कारखाना आर्थिक अरिष्टयातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत होते.

गेली काही महिने नॉट रिचेबल असणारे भगिरथ भालके हे आपले वडिल आमदार भारतनाना भालके यांच्या पहिल्या स्मृतीदिनी काय बोलणार याकडे संपूर्ण पंढरपूरसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. भालके म्हणाले की, मी गेली तीन महिने तुमच्या संपर्कात नव्हतो, हे खरं आहे. पण, माझे भाऊ, माझी पत्नी जनतेच्या कायम संपर्कात होते. गोरगरिबांच्या मांडीला मांडी लावून बसून त्यांची दुःखे जाणून घेण्याची शिकवण आम्हाला नानांनी दिली आहे. ती आम्ही कायम पाळत आलो आहोत आणि यापुढेही पाळत राहू. त्यामुळे मी जरी जनतेच्या संपर्कात नसलो तरी माझे आप्तजन हे तुमच्या जवळ होते. सध्या आपल्यावर जी अडचण आली आहे, त्यावर आपण लवकर मात करणार आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

भगिरथ भालके यांनी या वेळी आमदा भारतनाना भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, पितृछत्र हरपल्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांना कसे सामोरा गेले, हेही त्यांनी या वेळी सांगत नानांना आदरांजली अर्पण केली. पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील अनेक सामाजिक, राजकीय, शिक्षण आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT