Solapur, 04 June : विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ज्या उमेदवारांना बोलणं अपेक्षित होतं, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. पण, काही लोकांशी कॉन्टक्ट झाला नाही किंवा काही लोकांशी कॉन्टक्ट करावा, असं मला वाटलं नाही. अशा लोकांशीच मी बोललो नाही, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर दिली.
सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यात लढत होत आहे. उर्वरीत सात उमेदवारांनी आज माघार घेतली. त्यानंतर गोरे माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, सोलापूर विधान परिषदेची निवडणूक लागली आहे. विरोधाला विरोध म्हणून उमेदवार उभे असली तरी भाजप गांभीर्याने ही निवडणूक लढवणार आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकेल. आता फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे. अशी परिस्थिती असली तरी गाफील न राहता ही निवडणूक गांभीर्याने लढवून जिंकू.
बहुतांश लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, ते सर्वजण भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून ते जिंकावेत, यासाठी मदत करणार आहेत. भाजपचा विजय होणार, याची विरोधकांनाही पूर्ण जाणीव आहे, असे गोरे म्हणाले.
पालकमंत्री म्हणाले, विधान परिषदेची निवडणूक कशी लागली आणि कोणी लावली, यादृष्टीने बोलणे आता उचित नाही. आम्ही ही निवडणूक ताकदीने लढली पाहिजे, आम्ही ती लढू. मी आज सांगतो, या निवडणूकीतील मार्जिन बघून उमेदवार भविष्यात उमेदवारी करण्याचा विचारही करणार नाही. पुढील निवडणुकीत विरोधक उमेदवार देणार नाहीत, असं मार्जिन या निवडणुकीत भाजप उमेदवारांचं असेल. विजयाचा आकडासुद्धा मी सांगेन. फक्त मला एक दिवसाचा वेळ द्या.
निवडणुकीत झारीतला शुक्रचार्य कोणीही नाही. वसंतराव देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या मागे जे आहेत, त्यांची आता ताकद राहिलेली नाही. कोण पाठीमागे आहे आणि कोण पुढे आहे, हे बघायचं कारण नाही. लोकशाहीमध्ये विरोधक एकवेळ उभा राहिला की, त्याला कमी समजण्याचे कारण नाही. ही निवडणूक गांभीर्याने लढली पाहिजे ती आम्ही लढू, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
गोरे विरुद्ध मोहिते पाटील लढत होणार का, या प्रश्नावर गोरे म्हणाले, ज्यांच्याकडे 616 पैकी 16 मतं नाहीत, अशा लोकांशी लढाई होण्याचं काय कारण नाही. ही निवडणूक म्हणजे फक्त औपचारिकता आहे आणि ती आम्ही 18 तारखेला पूर्ण करू.
कोणाचे तरी नाव घेऊन मोठं करू नका
विनाकारण कोणाचे तरी नाव घेऊन कोणाला मोठं करायचा प्रयत्न करू नका, ज्या कारणासाठी निवडणूक लागली, ते कारण आपण साध्य होऊ देऊ नका, असा सल्लाही जयकुमार गोरे यांनी माध्यमांना दिला.
ते वाक्य मोहिते पाटलांसाठी नव्हतं
आगे आगे देखो होता है क्या हे मी मोहिते पाटील यांच्यासाठी बोललो नव्हतो. भारतीय जनता पक्षाने मला काही उद्दिष्ट ठेवून येथे पाठवला आहे, ते उद्दिष्ट मी पूर्ण करणार आहे. पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. आम्ही तिसऱ्या टप्प्यात आहोत. तिसऱ्या टप्पा पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टप्प्याची वाट मोकळी झालेली आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
जयकुमार गोरे म्हणाले, बिनविरोध निवडणूक झाली नाही, हे माझं नव्हे तर तुमचं (माध्यमांचं) अपयश आहे. लोकशाहीत निवडणूक लागली पाहिजे व मतदान देण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. आपण बाबासाहेबांच्या विचारांशी सुसंगत राहिलं पाहिजे.
सगळ्या अदृश्यशक्तींवर माझं बारकाईनं लक्ष : गोरे
सगळ्या अदृश्यशक्तींवर माझं बारकाईने लक्ष आहे. या दृश्य शक्तीसंदर्भात काळजी करण्याचं काही कारण नाही. या अदृश्य शक्तींवर बारकाईने आपण लक्ष ठेवून काम करू, असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.