Nitin Gadkari
Nitin Gadkari  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मला असे वाटतय की मी केंद्रातील नव्हे तर राज्याचा बांधकाम मंत्री आहे

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 4 हजार 74 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात उपस्थित काही आमदारांनी गडकरी यांच्याकडे स्थानिक रस्त्यासंदर्भात निवेदने दिली होती. I think I am the construction minister of Maharashtra, not the center

या प्रसंगी नितीन गडकरी म्हणाले, रस्त्यासाठी मला अनेक आमदार विमानप्रवास करून दिल्लीत भेटण्यासाठी येतात. स्थानिक रस्त्यांच्या कामांसाठी निवेदने देतात. मला आताही निवेदन देण्यात आले. त्यामुळे मला आता असं वाटायला लागलं आहे की मी केंद्रातील नाही तर राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे. छोट्या-छोट्या रस्त्यांच्या कामांची निवेदने केंद्रीय मंत्र्याला देऊन उपयोग काय? मोठ्या रस्त्यांची कामे सांगा, असेही गडकरींनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाकडून केवळ रस्त्यांचीच कामे होतात असे नाही. बुलडाण्यासारख्या दुष्काळी भागांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातून नदी खोलीकरण, रुंदीकरणही करण्यात आले आहे. नदीवर पूल, बंधाऱ्याची कामेही यातून होत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात काढलेल्या पाणलोट संदर्भातील शासन आदेशाची चांगली अंमलबजावणी झाली तर भूगर्भातील पाणी पातळी वाढेल. यातून शेती विकास होऊ शकेल.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार रोहित पवार, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, अरूण जगताप, संग्राम जगताप, माजी मंत्री राम शिंदे, महापौर रोहिणी शेंडगे, भाजपचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते.

अहमदनगर पुणे जिल्ह्यातील रस्त्यांविषयी

अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील रस्त्यांविषयी गडकरी म्हणाले, अहमदनगर-पुणे रस्त्याच्या चौपदरीकरण काम माझ्याच काळात झाले. त्यामुळे या रस्त्यावर किती वाहतूक आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या रस्त्यावरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी मी काही प्रकल्प हाती घेतले आहे. त्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. वाघोली ते शिरूर दरम्यान तीन तळाचे रस्ते करण्याचे नियोजन सुरू आहे. यात खाली चार पदरी, त्यावर चार पदरी व त्याच्यावर सहा पदरी रस्ता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करत आहोत. अहमदनगर ते तळेगाव दरम्यानही असाच पूल तयार करण्याचा प्रयत्न आहे. मात्र यासाठी राज्य सरकारने सिमेंट, दगड व स्टिलवरील कर माफ करावा ही अट आहे, असेही गडकरींनी स्पष्ट केले.

नाशिक, नगर व सोलापूर रस्त्यांचे भाग्य उजळणार

नाशिक, नगर व सोलापूर रस्त्याविषयी ते म्हणाले, सुरत ते चेन्नई असा पुणे-मुंबई एक्सप्रेसवे पेक्षाही तीन पट मोठा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तयार करणार आहे. त्यामुळे नाशिक, नगर व सोलापूर जिल्ह्यातून हा रस्ता जाईल. या रस्त्यासाठी एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 8 हजार कोटी खर्च करणार आहे. मी स्वतःच शेतकरी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. या रस्त्यामुळे दिल्ली ते चेन्नई अंतर 330 किलोमीटरने कमी होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT