Gopichand Padalkar-Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : पडळकरांनी जयंत पाटलांना पुन्हा डिवचले; ‘राजारामबापू पाटील कारखान्याचे नाव बदलणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार’

Jaat Sugar Factory Dispute : राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रातोरात बदलण्यात आले आहे. त्याला गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दर्शवला असून, शेतकऱ्यांसोबत शेवटपर्यंत उभे राहण्याची घोषणा केली.

Vijaykumar Dudhale

जत तालुक्यातील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव बदलून ‘राजे विजयसिंह डफळे’ करण्यात आले आहे. आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर सत्तेचा गैरवापर करून कारखाना कमी दरात ताब्यात घेतल्याचा आरोप केला आणि तो पुन्हा सभासदांना परत देण्याची मागणी केली.

त्यांनी स्पष्ट केले की, नाव बदलले तरीही सभासदांचा संघर्ष सुरूच राहील आणि कारखाना पुन्हा सहकारी संस्थेच्या ताब्यात येईपर्यंत ते शांत बसणार नाहीत.

Mumbai, 24 October : जत तालुक्यातील जनतेच्या भावना ह्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव बदलून व्यक्त झालेल्या आहेत. या कारखान्याचे नाव ज्यांनी कोणी बदलले आहे, त्यांच्या पाठीशी मी उभा आहे. त्यांचा रोख माझ्याकडे असला तरी त्याने मला फरक पडत नाही. ज्या लोकांनी हे आंदोलन सुरू केले आहे, त्या आंदोलनासोबत मी असणार आहे. रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई सभासदांनी लढायची ठरवली आहे. या दोन्ही लढाईत मी सभासदांच्या सोबत उभा राहणार आहे. याचा शेवट लागेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत असणार आहोत, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.

जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे नाव रातोरात बदलून ते राजे विजयसिंह डफळे असे नामकरण करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar ) त्या घटनेबाबत स्पष्टपणे भाष्य केलेले आहे. त्यामुळे जतमधील कारखान्याचे नाव कोणी बदलेले, अशी चर्चा रंगली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, जत तालुक्यातील जनतेच्या भावना ह्या राजे विजयसिंह डफळे या कारखान्याशी जोडल्या गेल्या आहेत. जत तालुक्याची अस्मिता म्हणजे राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना आहे. पण सत्तेचा गैरवापर आणि गैरफायदा घेऊन सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंक आणि राज्यात सत्तेत असल्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशात घालून घेतला आहे.

जत विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे की, तो कारखाना जयंत पाटील यांनी तालुक्यातील लोकांना परत द्यावा. राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचे सुमारे २२ हजार सभासद आहेत. पूर्वी कारखाना जेव्हा स्थापन झाला, तेव्हा जत तालुक्यात उसाचं एक कांडही मिळत नव्हतं. पण आता तालुक्यात असणाऱ्या इतर दोन साखर कारखान्यांना येथील उस जातो. तसेच, कर्नाटकातील साखर काखान्यांना जतमधून ऊस जातो, असा दावा पडळकरांनी केला.

ते म्हणाले, जयंत पाटील हे अत्यंत सुसंस्कृत, संस्कारी नेते आहेत, असं त्यांचं मात आहे आणि मीडिया हे वारंवार दाखवतं. दिसायला स्मार्ट असल्यामुळे कदाचित तुम्हाला तसं वाटत असेल. जयंत पाटील हे जर खरंच सुसंस्कृत आणि संस्कारी असतील तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, सातत्याने दुष्काळ पडणाऱ्या तालुक्यातील लोकांनी सभासद फी भरली आहे. काहींनी बॅंका, सोसायटी आणि सावकरांचे कर्ज काढून कारखान्याची सभासदांची फी भरलेली आहे.

हजारो कोटी रुपयांचा राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याची अडीचशे एकर जमीन आहे. कारखान्याची इमारत, मशनरी, गोदाम, स्टाफचे क्वॉर्टर्स आहेत. त्यामुळे कारखान्याची एवढी मोठी प्रॉपर्टी ४० कोटींना जयंत पाटील यांच्या घशात घातलेली आहे. तुम्ही जर सुसंस्कारी आणि सुसंस्कृत असाल तर कारखाना सभासदांच्या नावावर करून द्या, अशी मागणी पडळकर यांनी केली.

ते म्हणाले, तुम्हाला एक रूपया कोणी देणार नाही. कारण, तुमचे सहकारी विशाल पाटील आहेत, त्यांनी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना दत्त ॲग्रो इंडिया कारखान्यास भाड्याने दिलेला आहे. त्यांनी भाडं किती येतं ते सांगावं. त्याप्रमाणे हिशेब करावा आणि उरलेले पैसे, साखर कारखाना जयंत पाटील यांनी आमच्या तालुक्यातील सभासदांच्या नावावर करून द्यावा.

नावात बदल करण्याची प्रक्रिया केलेली नाही : गोपीचंद पडळकर

जत तालुक्यातील साखर कारखाना जयंत पाटील यांनी विकत घेतला. पण नावात बदल करण्याची प्रक्रिया त्यांनी केलेली नाही, असं काही जाणकरांचं म्हणणं आहे. त्याबाबत साखर आयुक्त माहिती देतील. पण ज्यांनी कारखान्यात काम केलं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की राजे विजयसिंह डफळे असेच या कारखान्याचे नाव आहे. त्यांनी नाव बदललं तरी आमचा संघर्ष चालूच राहणार आहे. जोपर्यंत हा कारखाना सभासदांचा आणि सहकारी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

Q1. जत तालुक्यातील कोणत्या साखर कारखान्याचे नाव बदलण्यात आले?
A1. राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव ‘राजे विजयसिंह डफळे’ असे ठेवण्यात आले.

Q2. आमदार गोपीचंद पडळकर यांची या प्रकरणातील भूमिका काय आहे?
A2. त्यांनी सभासदांच्या आंदोलनाच्या आणि जनतेच्या भावनांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.

Q3. पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर कोणता आरोप केला?
A3. त्यांनी सत्तेचा गैरवापर करून कारखाना अवघ्या ४० कोटींना स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा आरोप केला.

Q4. पडळकरांनी कारखान्याबाबत काय मागणी केली?
A4. त्यांनी कारखाना पुन्हा सभासदांच्या आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT