Sharad Pawar, Rajesh Patil, Hasan Mushrif News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur politics : आपल्याच तालमीतल्या मुश्रीफ अन् पाटलांनी साथ सोडली; आता पवारांनाच आखाड्यात उतरावं लागणार

NCP Kolhapur News : जिल्ह्यातील राष्ट्रवादीची सुत्रे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हाती होती

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादीचे आमदार गेले आहेत. हौस किंवा पर्याय म्हणून नव्हे तर ईडीचा ससेमिरा वाचवणे, भविष्यातील राजकीय तडजोड आदी कारणांमुळे या दोन आमदारांसह त्यांचे पाठिराखे अजित पवार यांच्या गटात गेले असले तरी अजूनही मूळ कार्यकर्ते असतील किंवा प्रमुख नेते हे मनाने शरद पवार यांच्यासोबत तर कृतीतून दादांकडेच असे चित्र आहे.

दरम्यान, ज्यांच्या हाती जिल्ह्यातील राष्ट्रवादीची सुत्रे होती त्या मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीच बंड केल्याने शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीची जिल्ह्यात पक्ष बांधणी करताना कसोटी लागणार आहे. पंचवीस वर्षांपुर्वी राष्ट्रवादीच्या स्थापनेची मुहुर्तमेढ कोल्हापूर जिल्ह्यात रोवली गेली. काँग्रेसमधून ज्यादिवशी पवार बाहेर पडले, त्याच दिवशी त्यांचा कोल्हापूर दौरा होता.

माजी मंत्री कै. दिग्विजय खानविलकर यांच्या निवासस्थानी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची छोटेखानी बैठक घेऊन राष्ट्रवादीच्या उभारणीची चर्चा केली. त्यानंतर हा जिल्हा नेहमीच राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहीला. जिल्ह्यातील दोन्ही खासदार, चार आमदार, जिल्हा बँकेसह बहुंताशी स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीचा सहभाग राहीला. मात्र, पक्ष बांधणीच्या पातळीवर दुर्लक्ष केले गेले.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोणीही असले तरी मुश्रीफ हेच पक्ष चालवत होते. राष्ट्रवादी म्हणजे मुश्रीफ आणि मुश्रीफ म्हणजे राष्ट्रवादी असे चित्र निर्माण झाले. त्यातून काही नेते नाराज झाले आणि त्यातून कै. खानविलकर, माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक, श्रीमती निवेदीता माने, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह कुपेकर, खासदार धैर्यशील माने यासारख्या दिग्गजांनी पक्ष सोडला. परिणामी तीन विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघात राष्ट्रवादीकडे प्रबळ उमेदवार नाही अशी स्थिती आहे.

एकीकडे पक्षाची ही अवस्था असताना नेते म्हणवून घेणाऱ्यांनीही आपला मतदारसंघ, कार्यकर्ता, नातेवाईक एवढ्या पुरतेच बघितले. त्यातून पक्षाची अवस्था दयनीय झाली. काँग्रेसच्या (Congress) कुबड्या घेतल्याशिवाय कोणत्याही सत्तेत स्थान मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुश्रीफ, चंदगडचे आमदार राजेश पाटील (Rajesh Patil), जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, युवराज पाटील यांच्यासह गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्ते मुश्रीफ यांच्या पाठोपाठ गेले. त्यामुळे आज पक्षात कोण राहीले याचा विचार केला तर फारशी ताकद दिसत नाही.

अलिकडेच पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय उद्योजक व्ही. बी. पाटील, शहराध्यक्षपदी आर. के. पोवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवकचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील हे जुन्या पक्षासोबतच राहीले आहे. शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा हा जिल्हा आहे. त्यामुळे एवढा मोठा उठाव होऊनही तसा जल्लोष मूळ राष्ट्रवादीतून दिग्गज बाहेर पडल्यानंतरही दिसत नाही. ही वादळापुर्वीची शांतता म्हणावी अशी परिस्थिती आहे. शरद पवार यांचा एखादा दौरा झाला तर पक्षाची ताकद कळेल आणि आगामी निवडणुकीत लेखाजोखाही स्पष्ट होईल. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT