Swabhimani Sanghatna Agitiation
Swabhimani Sanghatna Agitiation Pramod Ingale, satara
पश्चिम महाराष्ट्र

सहकारमंत्र्याच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांवर अन्याय; स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : ऊस गाळपास १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही जिल्ह्यातील काही कारखान्यांनी अद्याप एकरकमी एफआरपीची FRP रक्कम दिलेली नाही. तसेच महावितरणकडून खोटी बिले देत शेतकऱ्यांचे Farmers वीज कनेक्शन तोडले जात असून सहकार मंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी एकच गट्टी, राजू शेट्टी, उसाला एकरकमी दर मिळालाच पाहिजे, ऊस आमच्या बापाचा, नाही कुणाच्या बापाचा.., अशी घोषणाबाजीही कार्यकर्त्यांनी केली.

सातारा जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी काही साखर कारखान्यांनी पहिली उचल दिलेली नाही. तसेच वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडली जात आहेत. ही महावितरणची दादागिरी सुरू आहे. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, धनंजय महामुलकर, देवानंद पाटील, विजय चव्हाण, रमेश पिसाळ, नितीन यादव, दादासाहेब यादव, श्रीकांत लावंड, संदीप पवार, विकाम कदम, रवींद्र घाडगे, महादेव डोंगरे, हेमंत मोरे, हेमंत खरात, राजू घाडगे आदी उपस्थित होते.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले, ''या हंगामात गाळप झालेल्या ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ दिवसाच्या आत काही कारखान्यांनी दिलेले नाही. सहकारमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात वेळेवर ऊस बिले दिली जात नाहीत. खटाव व कऱ्हाड तालुक्यांतील साखर कारखाने ऊस बिले देण्यास तयार आहेत. पण, इतर कारखाने आडमुठेपणा करत शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. जोपर्यंत कायद्यानुसार एकरकमी एफआरपी देत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलने करणार आहोत. कारखानदारांची गुरमी उतरवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले, कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आला आहे. दुसऱ्या बाजूला हेच मंत्री कर्जाचे हप्ते, वीजबिल भरण्यास सांगत आहेत. आरोग्य, शिक्षण यांसारखे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. महावितरण कंपनी खोटी बिले देऊन कनेक्शन कट करत आहेत. यातून शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. येत्या चार दिवसांत तोडलेली कनेक्शन जोडावीत, अन्यथा त्याचा परिणाम अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोगावा लागेल. तसेच न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावरील लढाईसाठी स्वाभिमानी मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा देत सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन श्री. शेळके यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT