Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : भाजपवाले यापुढे मतदानही होऊ देतील की नाही, ही शंकाच : काँग्रेस नेत्याने व्यक्ती केली भीती

विश्वभूषण लिमये

Solapur News : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनच्या संदर्भात दिलेला निर्णय हा अपेक्षितच होता. हे सगळंच त्यांच्याच बाजूने चालणार आहे. कितीही चुकीचं असलं तरी हे सरकार त्यांच्याच बाजूने चालणार आहे. यापुढे लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक असणारं मतदानही ते होऊ देतील की नाही, याबाबत शंका आहे, अशी भीती काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. (It is doubtful whether BJP will allow voting in future : Praniti Shinde)

सोलापुरात आज चार हुतात्म्यांच्या स्मृती दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केले. त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर भाष्य केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूकपूर्व महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्या म्हणाल्या की, सोलापुरातील चारही हुतात्मे हे वेगवेगळ्या जातीधर्मातून जरी येत असले तरी आपल्या मातीसाठी त्यांनी बलिदान दिलं. चार हुतात्म्यांचं प्रतीक हे देशासाठी आज महत्वाचं आहे. या मातृभूमीने कधीही भेदभाव केला नाही. ज्यांनी मातृभूमीसाठी रक्त वाहिले, त्यांच्या रक्ताची कधी जात-पात-जमात नव्हती.

आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण मातृभूमिसाठी काम करत आहोत, ते करताना आपण जात-पात-धर्माच्या नावावर समाजाला तोडण्याचा प्रयत्न केला, तर तो आपल्या हातून घडणारं सर्वात मोठं पाप असेल, असेही प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील वाढत्या दौऱ्याबाबतही आमदार प्रणिती शिंदे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचं त्यांचे दौरे वाढतात. पण, जेव्हा लोकांना गरज असते, तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाहीत, ही शोकांतिका आहे. हे लोकांना कळलं पाहिजे. ते जिथे जातील तिथे धर्म,जात, पात हेच करतील.

चार शंकराचार्यांनी अयोध्येतील अर्धवट मंदिरात रामाची प्रतिष्ठाना करण्यास नकार दिला. त्यावरही प्रणिती शिंदे म्हणाल्या की, चार शंकराचार्य म्हणाले की, कोणत्याही वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यापूर्वी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही. पण, मोदी जे करतात, ते निवडणुका समोर ठेवूनच करतात. पण, चार शंकराचार्यांनी दिलेला नकार हा मोदींसाठी अपशकून ठरणार आहे

शंकराचार्य जे आपले धर्मगुरु आहेत, हिंदू धर्माचे सर्वेसर्वा आहेत, त्यांनीच हा इव्हेंट बायकॉट केला आहे. रामनवमी येत्या 11 एप्रिल रोजी आहे, त्याच दिवशी मोठ्या थाटात राम मंदिराचे उदघाटन होऊ शकलं असते आणि तोपर्यंत बांधकामही पूर्ण होऊ शकलं असतं. पण, केंद्र सरकारला एवढी घाई का आहे, असा सवाल करून प्रणिती शिंदे म्हणाल्या की, बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच प्राणप्रतिष्ठा करणे, हे फक्त इलेक्शनसाठी करत आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT