Bhandardara Dam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayakwadi Water Issue : जायकवाडीची तहान मुळा धरण भागवणार !

राजेंद्र त्रिमुखे

Nagar News: जायकवाडीसाठी काल ( शनिवारी )नाशिक मधील दारणा धरणातून त्यानंतर नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून 100 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर आज ( रविवारी ) पहाटे गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे. आता नगर जिल्ह्यातील 26 टीएमसी पाणी क्षमतेच्या मुळा धरणातून दुपारी 12 वाजेच्या सुमारास 2000 क्युसेक्सने पाणी जायकवाडीची तहान भागवण्यासाठी सोडले जाणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या अनुषंगाने जायकवाडी धरणात 65 टक्के पेक्षा कमी पाणीसाठा असल्यास असलेल्या पाण्याची तूट ही नगर नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून करण्याचे कायद्याने बंधन आहे. या अनुषंगाने जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वीच नगर नाशिक धरण समूहातून साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. मात्र हा आदेश जारी झाल्यानंतर नगर नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण एकूणच पेटले आणि जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास मोठा प्रचंड असा विरोध समोर आला. जायकवाडीसाठी पाणी सोडले जाऊ नये म्हणून आमदार अशुतोष काळे यांच्यासह अनेक जण अगोदरच न्यायालयात गेलेले आहे. मात्र दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आदेश देत जायकवाडीसाठी पाणी सोडले जावे असे आदेश दिल्याचे समजते. मात्र या आशुतोष काळे यांनी सुनावणीचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ नये असे म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकूणच आता नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून जायकवाडीसाठी साडे आठ टीएमसी पाणी सोडले जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्या अनुषंगाने दारणा, गंगापूर, निळवंडे या धरणातून गेल्या दोन दिवसात पाणी सोडले जात असतानाच आता मुळा धरणातून पाणी सोडले जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार दारणा, गंगापूर आणि निळवंडे ह्या धरणातून 100 क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. हा पाण्याचा वेग टप्प्याटप्प्यात वाढवला जाईल अशी माहिती आहे. दुसरीकडे आजपासून मुळा धरणातून सोडला जाणारा पाण्याचा विसर्ग हा थेट 2000 क्यूसेक्स इतका असणार आहे.

याबाबत मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी याबाबतची माहिती दिली असून मुळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. यापूर्वीच जिल्हा पोलीस प्रशासनाने पाणी सोडले जाणार असलेल्या भागात जमाबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्याचबरोबर या परिसरात विजेचा पुरवठा खंडित केला जाण्याची शक्यता आहे. पोलीस बंदोबस्त यावेळी सर्वत्र असणारा असून पाटबंधारे विभागाचे अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नदीपात्रातील फळ्या(बर्गे) काढण्याचे काम पूर्ण होत आलेला असून आज ( रविवारी ) दुपारी बारा वाजता मुळा धरणातून पाणी सोडले जाणार आहे

याबाबत मुळा पाटबंधारे विभाग जाहीर आवाहन केले असून त्यात, आज दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी मुळा धरणातून दुपारी 12.00 वाजता 2000 क्यूसेक्सने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल. तरी याबाबत मुळा नदीकाठच्या गावांना या जाहीर आवाहानाद्वारे सूचित करण्यात येते की, नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तु ,वाहने, पशुधन , शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी., असे मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी कळविले आहे.

(Edited by Sudesh Mitkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT