Jayant Patil Gherao by Shivsena
Jayant Patil Gherao by Shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अशी ही तऱ्हा : काॅंग्रेसचा प्रचार करू नये म्हणून जयंत पाटलांना शिवसेनेचा घेराव

सरकारनामा ब्यूरो

सांगली : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून निवडणूक लढवताना तीनही पक्षांची कसोटी कशी लागणार, याची चुणूक आज सांगलीमध्ये (Sangli) दिसली. काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना शिवसैनिकांनी घेराव घातला आणि प्रचार थांबविण्याची विनंती केली. पण पाटील यांनी आपला प्रचार पूर्ण केला.

महापालिकेच्या प्रभाग १६ च्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार तौफिक शिकलगार यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री जयंत पाटील यांची आज सभा झाली. हारूण शिकलगार यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. त्यांचे पुत्र तौफिक यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्यासह शिवसैनिकांनी जयंत पाटील यांना भेटून शिवसेनेचा प्रचार करावा अन्यथा कॉंग्रेसचा प्रचार थांबवा अशी घेराव घालून विनंती केली. मात्र श्री. पाटील यांनी ही जागा कॉंग्रेसची आहे. आपण महाआघाडीत असे करायला लागलो तर कसे होणार असे सांगत शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

``महाराष्ट्रात तीन पक्षांची सत्ता आहे. काँग्रेसने कोणालाही विश्वासात न घेता येथे उमेदवार दिला. या उमेदवाराच्या मागे राष्ट्रवादीला फरपटत नेल्यामुळे आघाडीचा धर्म लोप पावतो. राष्ट्रवादीला जितकी जवळची काँग्रेस तितकीच शिवसेना. त्यामुळे आघाडी धर्म पाळताना काँग्रेस प्रचार न करता शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा. अन्यथा चालू असलेला प्रचार थांबवावा,`` अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. मात्र पाटील यांनी ती मान्य केली नाही.

या वेळी सभेत बोलताना पाटील म्हणाले की भाजपने महापालिकेची सत्ता मिळविली पण जनतेच्या भल्यासाठी त्यांची सत्ता नव्हती. भाजपच्या सुजाण नगरसेवकांनी साथ दिली. त्यामुळे आघाडीची सत्ता आली. काँग्रेसमुळेच राष्ट्रवादीचा महापौर झाला, हे विसरता येणार नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्व नेते, महापौर व पदाधिकारी लक्ष देतील व कॉंग्रेसचे शिकलगार यांना बहुमताने विजयी करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर सुरेश पाटील, प्रदेश संघटक सचिव शेखर माने, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहूल पवार, नगरसेवक मयूर पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, हारूण शिकलगार यांनी मदन पाटील यांना कायम साथ दिली. त्यांच्या निधनाने निवडणूक लागली आहे. त्यांचे पुत्र तौफिक या तरुण कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. शिकलगार कुटुंबियांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली आहे. हे लक्षात घेऊन तौफिक यांना जनतेने साथ द्यावी. भाजपला गेल्या निवडणुकीत साथ दिली. पण त्यांचा विकास पाहता काही उपयोग झाला नाही. काँग्रेसच्या तसेच भाजपमधील काही सुजाण नगरसेवकांनी दिग्विजय सूर्यवंशी यांना महापौरपदासाठी निवडून दिले. महापालिकेत आघाडीची सत्ता आल्यापासून नवे उपक्रम राबविले जात आहेत.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, हारूण शिकलगार यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे तौफिक शिकलगार यांना बिनविरोध करावे, यासाठी प्रयत्न केले होते. पण सतत राजकीय विचार करणार्‍यांमुळे ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. भावनिक विषयावर कठोर निर्णय घेण्याचे काम जाणीवपुर्वक भाजपकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT