Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur-Mangalwedha : पंढरपूर-मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; जयंत पाटलांच्या दौऱ्यात वाटचाल ठरणार

हुकूम मुलाणी

Solapur Political News : राष्ट्रवादी काँग्रेसची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पक्षफुटीनंतर पुरती वाट लागल्याचे दिसून येत आहे. राज्यातील राजकीय साठमारीत या मतदारसंघात शरद पवारांना मोठा फटका बसला आहे. येथे पडलेल्या मोठा खड्डा भरून काढण्याची जबाबदारी फक्त विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटलांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. यातच 2019 च्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शुक्रवारी मंगळवेढा दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीच्या दृष्टिकोनातून हा दौरा महत्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

मे महिन्यात विठ्ठल कारखान्यावरील कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अध्यक्ष पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर पोटनिवडणुकीतील पराभूत उमेदवार भगीरथ भालकेंनी भारत राष्ट्र समितीची वाट धरली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली होती.

त्यातच अजित पवारानींही पक्षाशी फारकत घेत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पदरात सध्या उपमुख्यमंत्री पदासह पुण्याचे पालकमंत्री पदही पडले आहे. तालुक्यातील बिनीचे शिलेदारही त्यांच्यासोबत गेल्याने पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात आले. अशा स्थितीत पक्ष टिकवणे, वाढण्याची जबाबदारी अभिजीत पाटील यांच्यावर येऊन पडली.

मंगळवेढ्यात यापूर्वी पदाधिकारी निवडीवरून धुसफूस झाली होती. आता विधानसभेच्या उमेदवार निश्चितीवरूनच निवडणुकीआधीच धूसफूस सुरू झाली. या परिस्थितीत सध्या अभिजीत पाटलांनी तालुक्यामध्ये त्यांच्या वाढदिवसापासून राजकीय संपर्क वाढवला. तालुक्यातील प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांना भेटून त्या सोडवण्याची मागणी केली. परंतु मंगळवेढ्याचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आजतागायत सर्वच पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी अभिजीत पाटलांसमोर पहिले आव्हान हे पक्षांतर्गत धूसपूस मिटवण्याचे असणार आहे. त्यानंतर तालुक्यातील प्रश्नांबाबत जन आंदोलन उभे करावे लागणार आहे. (Maharashtra Political News)

अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी आणि आता महायुती सरकारच्या कार्यकाळात तालुक्यातील अनेक प्रश्न कायम राहिले आहेत. यात मंगळवेढा उपसा सिंचन योजना, महात्मा बसवेश्वर स्मारक, चोकोबा स्मारक, याशिवाय ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य, पीकविमा, शिक्षकांची, आरोग्य खात्यातील रिक्त पदे, उजनी पाणी वाटपाचे फसलेले नियोजन, घरकुल लाभार्थ्याला न मिळालेली मोफत वाळू, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार प्रशासकाच्या हाती, आदी अडचणीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, मंगळवेढ्याच्या या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ता असताना देखील दुर्लक्ष केले आहे.

दरम्यान, अभिजीत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा म्हणून दीपक साळुंखे, उमेश पाटील, आणि लतीफ तांबोळी यांनी मोठे कष्ट घेतले होते. आता तेच अजित पवारांच्या गटात सामील झालेले आहेत. परिणामी अभिजीत पाटील हे सध्या पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर एकटे राहिलेले आहेत. पक्षाबरोबर अभिजीत पाटील यांना या मतदारसंघात अस्तित्व टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यात त्यांना वरिष्ठ राजकीय नेते कितपत पाठबळ देणार, यावर बरेच अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. याच दृष्टीने शुक्रवारी खुद्द जयंत पाटील (Jayant Patil) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT