Prateek Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pratik Patil : जयंतरावांचे सुपुत्र करताहेत लोकसभेची तयारी? 'हे' अभियान घेतले हाती...

Anil Kadam

Sangli News : मागील आठवड्यात जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगल्यानंतर त्यांचे चिरंजीव प्रतीक पुन्हा कामाला लागले आहेत. जयंतरावांनी सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर प्रतीक पाटील यांनी मतदारसंघात 'समृद्ध भूमी' अभियान हातात घेतले आहे. या माध्यमातून क्षारपड जमीन सुधारणा उपक्रम राबविण्यास सुरुवात करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक पाटील हे कामाला लागले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शरद पवारांचे विश्वासू जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने मागील आठवडा गाजला. मात्र, त्यांनी भाजप प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले. सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. चिरंजीव प्रतीक यांच्यासाठी सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चाचपणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु जयंतरावांच्या वारंवार होणाऱ्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. जयंतरावांचे पुत्र प्रतीक यांच्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची तयारी सुरू होती. ती गेली दोन महिने थंडावली होती. अशातच प्रतीक हे पुन्हा कामाला लागले आहेत.

वाळवा तालुक्यासह मिरज पश्चिम भागातील 8 गावांतील जनतेच्या आरोग्यासाठी दीड महिना अथक काम केल्यानंतर राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी वाळवा तालुक्यातील क्षारपड जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी 'समृद्ध भूमी अभियान' हाती घेतले आहे. माती परीक्षण, जमिनीची सुपीकता सुधारणा, पाचट व पाचटाचे महत्त्व आणि सच्छिद्र पाइप निचरा प्रणालीबाबत पाटील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 'संकल्प कृषिक्रांतीचा, मातीच्या सुपीकतेचा' हे अभियानाचे घोषवाक्य आहे. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजारामबापू पाटील साखर कारखाना हे अभियान राबवित आहे. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सच्छिद्र पाइप निचरा प्रणाली योजना राबविली जात आहे. एकरी 80 हजार रुपये खर्चापैकी शेतकऱ्यांनी 10 हजार भरायचे असून, 70 हजारचे अर्थसाह्य अल्पप्रक्रियेत बँकांकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. या दौऱ्यात शेतकऱ्यांना माहिती देताना त्यांचे मते जाणून घेतली जाणार आहेत.

जयंत पाटील यांनी पूर्वी क्षारपड जमीन सुधारण्यासाठी चर खुदाईसारखा प्रकल्प राबविला आहे. त्यानंतर त्यांनी राज्याच्या जलसंपदा मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना वाळवा व मिरज तालुक्यातील काही गावांत राज्य शासनाच्या वतीने 80 - 20 ही योजना आणली आहे. दरम्यान, प्रतीक पाटील यांनी 17 फेब्रुवारी 2023 रोजी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या अध्यक्षपदाची वर्षपूर्ती होत आहे. त्यांनी या एका वर्षाच्या कारकिर्दीत शेतकरी व कामगारांसाठी अनेक नावीन्यपूर्ण व अभिनव उपक्रम राबविले आहेत.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT