Prithviraj Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan: भाजप नेत्याचा पृथ्वीराज चव्हाणांवर आरोप; सरकार अन् स्थानिकांमध्ये समन्वय न ठेवल्याने...

Vishal Patil

Karad : कराड येथील विमानतळाचा विस्तार करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले असून, त्यासाठी भरघोस निधीचीही तरतूद सरकारने केली आहे. मात्र, या विस्तारीकरणाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन करताना योग्य नियमांचे पालन झालेले नसल्याचा आक्षेप नोंदवून, बहुसंख्य ग्रामस्थांनी याला विरोध दाखविला आहे.

संबधित ग्रामस्थांनी विमानतळ विस्तारीकरणविरोधी समितीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ.अतुल भोसले यांची भेट घेतली. यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी कॉग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सरकार आणि स्थानिकांच्यात समन्वय न ठेवल्याने एकूण वातावरण दूषित झाल्याचा आरोप केला आहे. 

कराड येथे डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीला मुंढे गावचे माजी सरपंच आनंदराव जमाले, रमेश लवटे, प्रमोद पाटील, सिद्धेश्वर पाटील, चंद्रकांत पाटील, हरिश्चंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील, हणमंत पाटील, विनायक शिंदे, शिवाजीराव शिंदे, महेश शिंदे, प्रशांत पाटील, भास्करराव धुमाळ, आत्माराम पाटील, दादासाहेब पाटील, संतोष पाटील, रामभाऊ पाटील, पंजाबराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, "विमानतळ विस्तारीकरणाबाबत लोकांच्या भावना तीव्र असून, मी लोकभावनेसोबत आहे. विकासाचे काम उभा करताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची विशेष काळजी राज्य सरकार घेत आले आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' ही भारतीय जनता पार्टीची भूमिका असून, त्याचे तंतोतंत पालन पक्षातील सर्व घटकांकडून आणि राज्य सरकारकडूनही केले जाते. त्यामुळे स्थानिकांचा विरोध डावलून कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही," अशी ग्वाही देतानाच याप्रश्नी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची भेट लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घडवून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कराड तालुक्यातील वारुंजी, मुंढे, गोटे, केसे,पाडळी या भागातील ग्रामस्थांनी विमानतळ विस्तारीकरणाला विरोध दर्शविला आहे. मात्र,विकासाचे काम करताना स्थानिक घटकांवर कुठलाही अन्याय होणार नाही,याची काळजी राज्य सरकार नेहमीच घेत असते. त्यामुळे कराड येथील विमानतळ विस्तारीकरण विरोधातील ग्रामस्थांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहचविणार असल्याची ग्वाही भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ.अतुल भोसले यांनी या ग्रामस्थांना दिली.

केवळ 300 खातेदारांनी पैसै घेतले

विमानतळासाठी जमीन भूसंपादन झालेलं आहे, त्यावेळी सरकारच्या नियमाचे पालन करण्यात आले नाही. तेथील परिस्थितीचा अभ्यास झाला नाही. भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेबाबत विचार झाला नाही. विमानतळाला स्थानिकांचा विरोध नाही. पंरतु, योग्य पध्दतीने प्रक्रिया राबवली नाही. लोकप्रतिनिधींनी सरकार आणि स्थानिकांच्यात समन्वय ठेवणं गरजेचं होत. परंतु 1110 खातेदारांपैकी 300 खातेदारांनी पैसे घेतले. तर 810 खातेदारांनी या प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. एकूणच सर्व प्रक्रियेत दूषित करण्याच्याजोगे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप डॉ. अतुल भोसले यांनी काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT