Karad, 11 August : वाढदिवसाच्या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होते, ते रोखण्यासाठी कराड नगरपालिकेने वाढदिवसासह अन्य फ्लेक्स लावण्यास बंदी घातली आहे. त्याचा ठराव यापूर्वीच केला आहे. मात्र, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स लावता यावेत, यासाठी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी तो ठराव बदलल्याचा आरोप काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे झाकिर पठाण यांनी केला. राजकीय व्यक्तीच्या वाढदिवसासाठी नियम बदलले जात असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
कऱ्हाड येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात नरगपालिका सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या वेळी शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, अखिल आंबेकरी उपस्थित होते.
पठाण म्हणाले, कऱ्हाड शहरात फ्लेक्ससाठी नगरपालिकेची रीतसर परवानगी घेतली जात नाही. कमी आकाराच्या फ्लेक्ससाठी परवानगी घेऊन प्रत्यक्षात मोठे फ्लेक्स लावले जातात. परवानगी एक दिवसाची असतानाही आठवडाभर फ्लेक्स लावले जातात.
शहराच्या विद्रुपीकरणासह पालिकेचा महसूलही बुडतो. यापूर्वी काही नगरसेवकांनी नियमबाह्य फ्लेक्स लावल्याची तक्रार करून संबंधितांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना लेखी आदेश दिले. मात्र, त्या आदेशांची अंमलबजावणी होत नाही.
माजी मंत्री पाटील यांच्या वाढदिनी फ्लेक्स लावता यावेत, यासाठी तो ठराव पालिकेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी बदलला आहे. या प्रकरणात रीतसर कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पठाण यांनी केला. दरम्यान, शहरातील विविध इमारतींवर मोठे होर्डिंग्ज उभारले आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली.
पठाण म्हणाले, बाराडबरी येथील उद्यान कामावरून भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, पहिली आमची मागणी आहे. भाजपकडून आरोप करण्यापूर्वीच त्यात सुमारे एक कोटी आठ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. सीएसआरमधून झाडे लावली असतील.
‘माझी वसुंधरा’ अभियानातून स्वतंत्र बाग उभारल्याचे दाखविले. मात्र, प्रत्यक्षात तेथे बाग अस्तित्वात नाही. येथील बागच चोरीला गेली आहे. सोलर पॅनलच्या कामातही गैरव्यवहार झाला. त्यात तत्कालीन मुख्याधिकारी, आरोग्य विभागातील एकाची चौकशी व्हावी, अशी मागणी पठाण यांनी केली आहे.
शहराध्यक्ष ॲड. जाधव म्हणाले, नगरपालिकेने हटविलेली अतिक्रमणे पुन्हा उभी राहात आहेत. गरिबांच्या उपजीविकेवर कारवाई करताना धनदांडग्यांना अभय दिले जात आहे. त्यामुळे त्या मोहिमेतही दुजाभाव झाला आहे. त्यासह बैलबाजार रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या सुधारण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.