Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिर्डी व संगमनेर स्वतंत्र मतदार संघ असल्याचे भान ठेवा : विखेंनी अधिकाऱ्यांना खडसावले

सरकारनामा ब्युरो

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या 26 गावांमधील शासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या वेळी त्यांनी महसूल विभागातील अधिकारांना समाचार घेतला. ( Keep in mind that Shirdi and Sangamner are separate assembly constituencies )

या समन्वय बैठकीस पदाधिकारी, कार्यकर्ते विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार विखे पाटील यांनी सर्व विभागांचा स्वतंत्रपणे आढावा घेवून प्रत्येक गावात सुरु असलेल्या शासकीय योजनांचा तसेच वैयक्तिक लाभांच्या योजनेचा सविस्तरपणे आढावा विभाग प्रमुखांकडून घेतला. अनेक गावांमध्ये तलाठी, कृषी सहायक यांच्या आढळून आलेल्या त्रुटीवर आमदार विखे पाटील यांनी नेमकेपणावर बोट ठेवत त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी सूचना दिल्या.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिर्डी आणि संगमनेर हे स्वतंत्र मतदार विधानसभा मतदार संघ असल्याचे भान अधिकारी आणि कर्मचारी यांनी ठेवावे. उगाच कुणाच्या सांगण्यावरुन मतदार संघातील 26 गावांमध्ये निर्णय करु नका. वाळू माफीयांची आणि ठेकेदारांची मक्तेदारी मोठ्या प्रमाणात वाढली असताना सुद्धा महसूल आणि पोलिस यंत्रणा त्यांना पाठीशी घालत आहे. कोणा भाऊच्या चिठ्यांवरुन कामे करण्याची प्रथा बंद करा सत्तेचा ताम्रपट कुणी घेवून आलेला नाही. अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वता:च्या भूमीकेवर ठाम राहूनच काम करावे. अन्यथा मलाही तुमच्या वरिष्ठांकडे तुमच्या विरोधात तक्रारी कराव्या लागतील असा इशारा आमदार विखे पाटील यांनी दिला.

नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या वाळू उपशाबाबत तलाठी, सर्कल यांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. डोळ्यादेखत वाळू उपसा होत असताना, महसूल खाते मात्र सर्व आलबेल असल्याचे सांगते. यावरुन आमदार विखे पाटील यांनी महसूल विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढले. नदीकाठच्या गावांमधील सर्व तलाठ्यांकडून आमच्या कार्यक्षेत्रातून वाळू उपसा होत नाही, असे लेखी स्वरुपात प्रांताधिकाऱ्यांनी लिहून घ्यावे असे सक्त आदेश देवून आ.विखे पाटील यांनी कामचुकार करणाऱ्या ओझर खुर्द आणि बुद्रुक या गावांतील तलाठ्यांना तातडीने नोटीसा काढण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. ओझर बु. येथील विज वितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या जागेमध्ये असलेले अतिक्रमण काढण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तलाठ्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पंचायत समितीचा आढावा गटविकास अधिकारी नागणे यांनी सादर केल्यानंतरही चिंचपूर येथील पाणी टंचाईच्या बाबतीत दिसून आलेला हलगर्जीपणा तसेच अन्य गावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामात नसलेला समन्वय तसेच गावातील तलाठी, ग्रामसेवक यांचा ग्रामस्थांशी नसलेला संवाद यावरुन आ.विखे पाटील यांनी बैठकीत नाराजी व्यक्त करतानाच 14व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत पंचायत समितीमध्ये स्वतंत्र बैठक घेवून पुन्हा आढावा घेण्याचे जाहीर केले.

कृषी विभागाकडून योजनांचा अंमलबजावणी होत असली, तरी यामधील त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात. कृषी योजना आज ठप्प झाल्या आहेत. कृषी सहायकांकडे अनेक गावांचा कारभार असल्याने एका गावाला न्याय देवू शकत नाही. अनेक कृषी सहायकांना आ.विखे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देता आली नाहीत. खत आणि बियाणं विक्री करणाऱ्या दुकानांच्या बाहेर भावफलक लावणे सक्तीचे करा. एकाही शेतकऱ्याची फसवणूक झाली, तर कृषी सहायकांनाच जबाबदार धरले जाईल. असे खडे बोलही त्यांनी सुनावले.

मोजणी विभागात मोठ्या प्रमाणात प्रकरणं प्रलंबित आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी सविस्तरपणे आढावा घेवून सर्व प्रकरण निकाली काढाव्यात. मोजणी कार्यालयात तातडीने बायोमेट्रीक मशिन बसवून अधिकाऱ्यांना वेळेत येणाच्या सूचना द्याव्यात. खरेदी विक्री विभागातील प्रभारी राजही लवकर संपवा अशा सूचना आमदार विखे पाटील यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बैठकीचा समारोप करताना आमदार विखे पाटील यांनी प्रशासनात संगमनेर तालुक्यातील काही लोकांचा मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. याबाबत आता मला कठोर पाऊलं उचलावीच लागतील. इतक्या दिवस आपण शांत पाहत होतो. मात्र आता कुणाच्या सूचनांवरुन चिठ्यांवरुन तुम्ही जर काम करणार असाल तर मलाही तुमच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी कराव्या लागतील. सत्तेचा ताम्रपट कुणी घेवून आलेले नाही. उद्या राज्यातील सत्ता बदलणारच आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वता:च्या भूमिकेवर ठाम राहून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

आमदार विखे पाटील म्हणाले की, निळवंड्याच्या फक्त डाव्या कालव्यांचीच चर्चा सुरु आहे. उजव्या कालव्यांच्या कामांनाही प्राधान्य देवून या भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आधीच धरणाच्या मूळ आराखड्याबाहेर जावून कामं सुरु आहेत. पाणी येण्याचा पत्ता नाही पण याआधीच उपसासिंचन योजनांना मंजूरी अधिकारी कसे देतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

याबैठकीस प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, कृषीअधिकारी सुधार बोराळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, बांधकाम विभागाचे आर.आर. पाटील, वीजवितरण कंपनीचे अनिल थोरात, निळवंडे प्रकल्पाचे कैलास ठाकरे, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे विवेक रोटे, आरोग्य अधिकारी डॉ. घोलप, सहा.निबंधक कांदळकर, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, गणेश तळेकर, डॉ. कचेरिया, पोलिस निरिक्षक पांडूरंग पवार, आश्वीचे सुभाष भोये, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे राजेंद्र लोखंडे यांसह तालुका स्तरावरील सर्व अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक उपस्थित होते.

यशोधन कार्यालयावरील नाराजी

सध्या शासकीय कार्यालयांमध्ये संगमनेर तालुक्यातील यशोधन कार्यालयाचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होत आहे. तहसील कार्यालय आणि तालुका पोलिस ठाणे त्यांच्या इशाऱ्यावरच काम करत आहे. त्यामुळे ही दोन्ही कार्यालयं यशोधनमध्येच सुरु करुन शासनाचा पैसा वाचवावा. असा खोचक टोला आमदार विखे पाटील यांनी लगावला. आजच्या समन्वय बैठक समितीचा हाच ठराव समजा अशा उपरोधिक शब्दांत त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT