Udhav Thackeray, Vishwajit Kadam, Eknath shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Loksabha News : शिवसेनेचा वाघ कोल्हापुरात शांत; सांगलीत काँग्रेसची डरकाळी

Rahul Gadkar

Kolhapur News : सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील तिढा सुटला असताना काँग्रेस नेत्यांची अजूनही मनाची शांतता झालेली नाही. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीत काँग्रेसचा हातच दिसावा यासाठी जिल्ह्यातील नेते सरसावले आहेत. अशातच आज महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला असताना आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा खदखद माध्यमांसमोर मांडली आहे. एकंदरीतच शिवसेनेचे वाघ इतर मतदारसंघात चिडीचूप आहेत. तर, काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीत डरकाळी फोडल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून हेच उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असतील असे जाहीर केले. मात्र तरी देखील सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना महाविकास आघाडीची भूमिका न पटलेली दिसते. त्यातच सांगली जिल्ह्यातील आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील कालपासून नॉट रिचेबल असताना त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

या भूमिकेनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीत अंतर्गत खदखद चव्हाट्यावर येण्याची शक्यता असून बंडखोरी अटळ हे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेसचे नेते, आमदार  विश्वजित कदम,  विशाल पाटील यांसह जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील, महेंद्र लाड, जितेश कदम यांनी पत्रकार परिषद घेत सांगली जिल्ह्यातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. शिवाय सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे बळ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या बाजूने दिला जाईल अशा अप्रत्यक्षपणे दिला जात आहे.

लोकसभा उमेदवारीबाबत आज काँग्रेस नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेत कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना दिसून आल्या. सांगली जिल्हामधील काँग्रेस नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावनेखातर ही पत्रकार परिषद घेत आहोत. असे स्पष्ट करत आमदार विश्वजित कदम यांनी, जागावाटप चर्चा चालू झाल्यापासून आम्ही सर्वजण काँग्रेसला सांगलीची जागा मिळावी यासाठी आग्रही होतो. वरिष्ठांकडे भावना पोहोचवल्या. सांगलीची जागा ही काँग्रेसला लढायला मिळावी, काँग्रेस त्याला सक्षम आहे या भावना आम्ही वरिष्ठांकडे पोहोचवल्या. 

गेल्या काही दिवसात मविआअंतर्गत ज्या बाबी झाल्या, त्यामध्ये कोल्हापूरची जागा शाहू महाराज लढणार असे जाहीर झाले. मात्र सांगलीबाबत काही ठरलं नसताना उद्धव ठाकरे यांनी अचानक चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. पण परिस्थिती समजून घेतली असती तर आज जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली नसती. आजही आमची मविआमधील सर्व नेत्यांना विनंती की सांगलीची परिस्थिती पाहून उमेदवारी बाबत फेरविचार करावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीला सत्य परिस्थितीची माहिती घेऊन ,पुन्हा फेरविचार करावा, ही महाविकास आघाडीला आमची विनंती आहे.  अशा शब्दात विश्वजीत कदम यांनी आपली भूमिका मांडली. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इशारा देत अमरावती आणि कोल्हापूर मध्ये देखील शिवसेनेची ताकद आहे हे विसरू नका, असे सूचक विधान करत इशारा दिला आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असताना सोलापूर सह इतर ठिकाणी मात्र ठाकरे गटाची गोची कायम आहे. सध्या ठाकरे गटाचे शिवसैनिक मूग गिळून गप बसण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे.

Edited By : Umesh Bambare  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT