Kolhapur News, 23 Sep : आगामी महापालिका निवडणुकीतील जागावाटपाच्या फार्म्युलावर अजून वरिष्ठांनी निर्णय दिला नसला तरीही स्थानिक पातळीवर आतापासूनच संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थानिक नेत्यांच्या दावे-प्रतीदाव्यामुळेच महायुतीतील बेबनाव समोर येत आहे.
जागावाटपात आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहण्यासाठी, स्थानिक नेत्यांकडून जागावाटपा संदर्भात भाष्य केले जात आहे. त्याला इतिहासाची जोड देत भाजपने थेट शिवसेनेलाच प्रती आव्हान दिले आहे. या सर्व प्रक्रियेत राष्ट्रवादी अजूनही जागा वाटपात संदर्भात मौन बाळगून आहे. मात्र, नेत्यांच्या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊन संभ्रम निर्माण होत आहे.
महापालिकेच्या सुरुवातीच्या काळात माजी आमदार महादेवराव महाडिक यांचीच तीस वर्षांहून अधिक काळ सत्ता राहिली. त्यावेळी भाजपचे जिल्ह्यात नामोनिशाण नव्हते. मात्र ताराराणी आघाडीच्या माध्यमातून हे वर्चस्व राखले. त्याविरोधात आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांनी आव्हान देत ही सत्ता खालसा केली.
2010 पासून महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू झाले आणि काँग्रेस व त्यावेळच्या राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता मिळवली. या सत्तेत शिवसेनेचेही जेवढे होते ते नगरसेवक सहभागी झाल्याचा इतिहास आहे. राज्यातील महाविकास आघाडी होण्याआधी कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात महाविकास आघाडी निर्माण झाली. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत महापालिकेवर सत्ता स्थापन केली.
मात्र सध्याची परिस्थिती पाहता महायुतीमध्ये शिवसेना, आणि राष्ट्रवादी आहे. तर ताराराणी आघाडी महाडीक गटाने भाजपमध्ये जवळपास विसर्जित केल्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकमेव आमदार असताना महानगरपालिकेवर जवळपास ताराराणी व भाजपच्या माध्यमातून 34 नगरसेवक निवडून आले.
प्रत्यक्षात क्षीरसागर हे 2009 ते 2019 पर्यंत शहराचे आमदार असून, शिवसेनेला अपेक्षित असे यश मिळाले नाही. एवढेच नाही तर क्षीरसागर यांचे वास्तव्य असलेल्या परिसरातही पक्षाचा नगरसेवक कधी निवडून आलेला नाही. मागील वेळी केवळ 4 नगरसेवक निवडून आले. 2015 च्या निवडणुकीत भाजप-ताराराणीला 34 जागा मिळाल्या होत्या, यावेळी त्या जागांसह आणखी 12 जागांचा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सूत्रे ही खासदार महाडिक यांच्याकडेच राहणार याची ही झलक आहे. त्यांना शह देण्यासाठी क्षीरसागर यांनीही शिवसेनेलाही किमान 30 जागा मिळाल्या पाहिजेत, असे कालच्या मेळाव्यात सांगितले. जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर होणार असताना या दोन नेत्यांत आतापासूनच वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भाजप, शिवसेना शिंदे गटाला एवढ्या जागा दिल्या तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला पूर्वी 12 जागा मिळाल्या होत्या, तेवढ्या तरी त्या मिळणार का नाहीत? हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. एकूण जागांची संख्या आणि दोन प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या दाव्यामुळेच इच्छुकांत मात्र घालमेल सुरू आहे.
नव्या, जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून उमेदवारी द्यावी लागणार असल्याने त्यातून प्रबळ, आर्थिक ताकद असलेल्या उमेदवाराचा शोध घेण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. दोन नेत्यांच्या वादात अशा एखाद्या उमेदवाराला डावललेही जाऊ शकते, त्यातून बंडखोरी होण्याची मोठी शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने अजून देखील यावर मौन बाळगले आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने 14 जागा मिळवले आहेत.
या चौदा जागांवर राष्ट्रवादीचा दावा असणार आहे. मात्र उर्वरित 29 धावांवर भाजपने 15 जागांवर दावा केला आहे. शिवसेनेकडून अधिक जागांचा दावा होत असताना राष्ट्रवादीने अद्याप देखील आपली भूमिका स्पष्ट केली नाही. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यास निवडणुकीला अजून अवधी असला तरी आतापासूनच जागावाटपावरून घमसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.