Kolhapur Vidhan sabha Election Mahayuti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Election : दावा सर्वांचा, पण ताकदीचा पैलवान भेटेना; कोल्हापूर उत्तरेत कोण मारणार बाजी?

Rahul Gadkar

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये या जागेवरून चुरस निर्माण झाली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये या जागेवरून चुरस आहे. या चार पक्षांमध्ये मतदारसंघ मिळवण्यासाठी स्पर्धा लागले असली तरी चारीही तुल्यबळ आणि फाइट देणारा उमेदवार नाही. इच्छुकांची संख्या अधिक असली तरी पक्षाने दिलेला उमेदवार निवडून येणार की नाही याची शाश्वती या मतदारसंघातून मिळत नाही. या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचारांचा वाढलेला टक्का आणि लोकसभा निवडणुकीत दिलेले शाहू महाराजांना पाठवा यावरून राजकीय वातावरण संभ्रमाचे तयार झाले आहे.

महायुतीत (Mahayuti) कोल्हापूर उत्तरची जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सेनेत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. पोटनिवडणुकीत या जागेवर भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना जवळपास 80 हजार मते मिळण्याने भाजपने या जागेवर दावा कायम केला आहे. तर शिवसेनेचा हा पारंपारिक मतदारसंघ असल्याने शिंदे गटाचा देखील या जागेवर दावा आहे. ही जागा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जोरदार फिल्डिंग लावली असल्याने ही जागा शिंदेसेनेला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण हे शहरातील मतदारसंघ असल्याने दोन पैकी एक जागा आम्हाला मिळावी, असा हट्ट शिवसेनेने केला आहे. तसे झाल्यास नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हेच महायुतीचे या मतदारसंघातील उमेदवार असू शकतात.

महायुतीमध्ये (Mahayuti) ही जागा कोणत्या पक्षाला जाणार याबद्दल शिंदेसेना व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. दोन्हीकडून त्याबद्दलचे दावे केले जात आहेत. त्याचवेळेला महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसची असेल हे खरे असले तरी उमेदवार कोण याबद्दलचा संभ्रमही कायम आहे. जिल्ह्यातील दहापैकी हा एकच मतदारसंघ असा आहे की जिथे दोन्ही आघाड्यांतून जागा व उमेदवार याबद्दलचा संभ्रम तुलनेत जास्त आहे. त्यामुळे पडद्याआड भेटीगाठी. मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

महायुतीत उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली असताना महाविकास आघाडीमध्ये तीच परिस्थिती आहे. विद्यमान आमदार काँग्रेसकडे (Congress) असल्याने काँग्रेसने देखील या जागेवर दावा केला आहे. पण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची जागा काँग्रेसला दिल्याने राष्ट्रवादीने तडजोडीवर ही जागा आपल्याकडे घेण्यास आग्रह धरला आहे. काँग्रेसचे आमदार जयश्री जाधव हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांना या ठिकाणाहून उमेदवारी मिळेल, ही शक्यता फार कमी आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावरून या मतदारसंघातील जनतेने दिलेले प्रेम हे विधानसभेला मिळेल असे नाही. तर काँग्रेसकडून शहराध्यक्ष सचिन चव्हाण, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र तळागाळापर्यंत पोहोचण्यास अनेक स्थानिक नेत्यांची मदत यांना घ्यावी लागणार आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील (V B Patil) यांनी या जागेवर दावा सांगितला आहे. कोल्हापुरातील फेटा आणि तालीम संघ यांच्याबाबत कनिष्ठ संबंध व्ही बी पाटील यांच्या आहेत. जुन्या जाणकार लोकांना व्ही बी पाटील यांच्याबाबत सकारात्मकता आहे. पण शहरात वाढलेली तरुणांची हिंदुत्ववादी मते, आणि परिवर्तन हे यांच्यापुढे आव्हान आहे. स्वच्छ चारित्र्य असून राजकीय भूमिका पक्की आहे. गेली तीस वर्षे कोल्हापूरच्या जडणघडणीशी ते संबंधित आहेत. त्यामुळे आपल्याला संधी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

एकंदरीत चारही पक्षाकडे उमेदवार असले तरी विजयाची खात्री कोणत्याच उमेदवाराबाबत सध्या तरी देता येत नाही. त्यामुळे उमेदवारीवरून सर्वच पक्षात संभ्रम तयार झाला असून राजकीय जोडण्या लावण्यात अनेक जण व्यस्त आहेत. त्या यशस्वी ठरल्या तरच उमेदवारावर शिक्कामोर्तब होईल असा राजकीय अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT