Satyajeet Kadam-Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Toll : कोल्हापूरचा टोल हे सतेज पाटलांचेच पाप; टोलप्रश्नी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला भाजप नेत्याचा टोला

Rahul Gadkar

Kolhapur, 03 August : पश्चिम महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांतील काँग्रेस उद्या (ता. 03 ऑगस्ट) पुणे-बेंगलोर महामार्गांवरील टोल वसुली आणि रस्त्यावरील समस्याप्रश्नी आंदोलन करणार आहे.

त्या पार्श्वभूमिवर भाजपचे नेते आणि माजी नगरसेवक सत्यजित ऊर्फ नाना कदम यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.

कोल्हापुरात (Kolhapur) 125 कोटींच्या रस्त्याचा खर्च 450 कोटी पर्यंत नेऊन त्याची वसुली कोल्हापुरातील नागरिकांच्या माथी मारण्याचे पाप पालकमंत्री असताना सतेज (बंटी) पाटील (Satej Patil) यांनी केले होते. पण, भाजप व शिवसेना सरकारने ते पैसे भरले, हे कोल्हापुरातील जनता विसरली नाही,’ अशा शब्दांत सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांनी टीकास्त्र सोडले.

कोल्हापूर शहरांतर्गत टोल लावून आणि टोल वसूल करणारे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे महाराष्ट्रात मात्र नेतृत्व दाखवत राष्ट्रीय महामार्गावरील लावलेले टोल मुक्त करा, अशा स्वरूपाचा कांगावा करत आहेत. अशी टीकाही कदम यांनी केली.

आमदार, खासदार, मंत्री यांना टोलची माफी असताना आणि संपूर्ण कोल्हापूरचा विरोध असतानाही स्वतः टोलची पावती फाडून कोल्हापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप या तत्कालीन पालकमंत्र्यांनी केले होते.

गेली 15 वर्षे कोल्हापूर महापालिकेत सत्ता व गेली 5 वर्षे कोल्हापूर शहरात दोन्ही आमदार असूनही कोल्हापूरकरांना शहरातील रस्त्यावरून फिरताना चंद्रावर फिरण्यासारखा अनुभव सतेज पाटील देत आहेत. या प्रश्नावर बोलायचे सोडून ते राष्ट्रीय व राज्याच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत, असा टोलाही कदम यांनी लगावला.

ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत अथवा ज्या रस्त्यांची कामे झालेली नाहीत, अशा रस्त्यांवरील टोल माफ करण्याचे केंद्र सरकारकडून धोरण निश्चित केले जात आहे. काही दिवसांतच त्याची अंमलबजावणी होणार असून त्यामध्ये पुणे-कोल्हापूर रस्त्याचा समावेश होणार आहे.

केंद्राच्या धोरणाची खात्रीलायक माहिती मिळाल्यानेच केवळ श्रेय मिळवण्याच्या हेतूने काँग्रेस व त्यांचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील हे टोलमुक्त आंदोलनाच्या नावाखाली आंदोलन करून, केंद्र सरकारच मुभा देणार असणाऱ्या योजनेचे श्रेय घेऊन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केले जात आहेत, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT