Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : महाराष्ट्रात लोकसभा अन् विधानसभा निवडणूक एकाच वेळी; जयंत पाटलांना असं का वाटतंय?

Vishal Patil

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचे पडघम कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असल्याने देशभरात सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातील राजकारण गेल्या पाच वर्षांत अनेकदा बदलले असून कोणाची युती कधी कोणासोबत होईल, यांचा अंदाज बांधता आलेला नाही. देशात अनेक निर्णय अचानक घेतल्याने देश आणि राज्य चुकीच्या दिशेने चालल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी महाराष्ट्रात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे सूचक वक्तव्य केले. 

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय निश्चय मेळावे होत आहेत. कराड तालुक्यातील उंब्रज येथे कराड उत्तर आणि कराड दक्षिण मतदारसंघातील मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले, 'देश आणि राज्य चुकीच्या दिशेने चालले आहे. त्याला विरोध करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकसंध राहिले पाहिजे. काळ अडचणीचा आहे. लोकसभेसोबत विधानसभा एकत्रित झाल्यास आश्चर्य वाटायला नको. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होण्यासाठी माजी राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीला शिफारस केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी जय्यत करावी,' असे आवाहनही त्यांनी दिले.

महागाई-बेकारी प्रचंड

सगळ्या गोष्टीत महागाई वाढली असताना बेकारी प्रचंड वाढली आहे. देशात बेकारीचा दर 5 टक्यावरून 10.9 टक्क्यांवर गेला. मनमोहनसिंग सरकारच्या काळात रुपया घसरला की मनमोहनसिंगच्या वयाचा दाखल दिला जात होता. त्यावेळी काँग्रेसला शिव्या देणारी भाषणे आठवा. तेव्हा 60-62 रुपयांवर रुपया पोहचला होता, आता 83 रुपयांवर आहे. तेव्हा देशातील आजची परिस्थिती किती बिकट आहे, असा सवालही आमदार पाटलांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्राने बिहारला मागे टाकले

भाजपचा एक आमदार पोलिस ठाण्यातच गोळ्या झाडतो. मुख्यमंत्र्यांना मी कोट्यावधी रुपये दिले आहेत, असे सांगतो. मग मुख्यमंत्रीच गुन्हेगार घडवण्याचे काम करत आहेत का, असा प्रश्न पाटलांनी उपस्थित केला. तसेच गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्याही पुढे गेला आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या जवळ असणारा एक आमदार छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) हाकलून द्या, अशी भाषा वापरतो. हे धाडस आले कुठून, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री व दोन-दोन उपमुख्यमंत्री असताना यांना राज्य सांभाळता येत नाही, अशी टीकाही जयंत पाटलांनी करून राज्य सरकारला घेरले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT