Raju Shetti, Prakash Ambedkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : 'स्वाभिमानी' राजू शेट्टींना बसणार 'वंचित'चा फटका?

Rahul Gadkar

Kolhapur News : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पराभवाचे प्रमुख कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मानले जात होते. 2019 च्या निवडणुकीत शेट्टी यांचे विरोधक धैर्यशील माने 93 हजार 785 मतांनी विजयी झाले होते, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तब्बल एक लाख 20 हजार मतदान झाले होते.

त्यामुळे चार लाख 80 हजार मतदान घेऊनही राजू शेट्टी यांना पराभवाचा सामना कारावा लागला. आता राजू शेट्टी यांनी 'एकला चलो'चा नारा दिला आहे. त्यात 'वंचित' महाविकास आघाडीत आल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वाढली आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीतदेखील राजू शेट्टी विजयापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या (Vanchit) उमेदवाराला मिळालेली मते राजकीय अभ्यासकांसाठी आश्चर्यकारक होती. वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच रिंगणात असताना त्यांना मिळालेल्या मतांनी सर्वाधिक फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju shetti) यांना बसला होता.

पण आता खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel mane) यांच्याविषयी जनतेमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. या परिस्थितीत शिवसेनेने (ठाकरे गट) गड अबाधित ठेवण्यासाठी ठाकरे गटाने 'वंचित'चे 2019 मधील उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांना शिवबंधन बांधले.

त्यांच्या रूपाने हातकणंगलेतील ठाकरे गट मजबूत राहील, अशी आशा आहे. सध्या तरी धैर्यशील माने यांच्याविरोधात स्वतंत्रपणे राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील. त्यांनी कोणाचाही पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे यांची राजू शेट्टी यांनी भेट घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडी शेट्टींच्याविरोधात उमेदवार देणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा शेट्टी यांच्या नावाला विरोध वाढत आहे.

त्यामुळे शिवसेनेकडूनही कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यास राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. ठाकरेंसोबत 'वंचित' असल्याने येथे ठाकरे गटाला मोठा फायदा होईल.

2019 निवडणुकीत 'वंचित'चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवार मागे घ्यावा, यासाठी शेट्टी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र, वंचित आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

जर स्वाभिमानी शेतकरी संघटना इंडिया आघाडीत सामील होऊन निवडणुकीला सामोरे गेल्यास त्याचा फायदा शेट्टी यांना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येणारा काळच हे शेट्टी यांचे राजकीय भवितव्य ठरवणारे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. एक कोल्हापूर आणि दुसरा हातकणंगले. 2019 लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेमध्ये 70.28 टक्के इतके मतदान झाले होते. भाजप-शिवसेना युतीकडून धैर्यशील माने, काँग्रेस-राष्ट्रवादी- स्वाभिमानीकडून राजू शेट्टी, तर वंचित बहुजन आघाडीकडून अस्लम बादशाहजी सय्यद निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत युतीचे उमेदवार धैर्यशील माने विजयी झाले होते.

2019 लोकसभा निवडणूक हातकणंगले मतदारसंघ निकाल

उमेदवार : मतदान : पक्ष

धैर्यशील माने : 5,74,077 : शिवसेना

राजू शेट्टी : 4,80,292 : स्वाभिमानी शेतकरी संघटना

अस्लम सय्यद : 1,20,584 : वंचित बहुजन आघाडी

धैर्यशील माने 93,785 मतांनी विजयी

(Edited By Roshan More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT