satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Congress Politics : सतेज पाटलांच्या राज्य नेतृत्वाला जिल्ह्यातच ब्रेक...; पण 'काँग्रेस अभी जिंदा है!'

Satej Patil Kolhapur Congress Politics : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील पराभवामुळे काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना राज्य नेतृत्वाची झेप घेत पुढे जात असलेल्या आमदार सतेज पाटलांना जिल्ह्यातच ब्रेक लागला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 27 Nov : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील पराभवामुळे काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना राज्य नेतृत्वाची झेप घेत पुढे जात असलेल्या आमदार सतेज पाटलांना (Satej Patil) जिल्ह्यातच ब्रेक लागला आहे.

त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा काँग्रेसला (Congress) उभारी देण्याची जबाबदारी आली आहे. सतेज पाटील यांना सोडल्यास दुसऱ्या फेरीतील काँग्रेस नेत्यांची समन्वयाची पकड कमकुवत झाल्याने काँग्रेसला जिल्ह्यात एकही आमदार निवडून आणता आला नाही. शिवाय दुसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि मतदारांना गृहीत धरल्याने काँग्रेसला पराभव पत्करावा लागला.

राज्य नेतृत्वाची कास धरत असताना जिल्ह्यातील नियोजनातील अभाव हे काँग्रेस उमेदवारच्या पराभवाचे कारण ठरले. काँग्रेसच्या पराभवामुळे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचा कस लागणार आहे. शिवाय सतेज पाटलांना (Satej Patil) कोंडीत पकडण्याचा डाव महायुतीच्या नेत्यांपुढे चालून आला आहे.

या डावातून सावरण्यासाठी स्थानिक स्वराज्य आणि सहकारी निवडणुकीत पाटलांना आपले बळ दाखवावेच लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि नेते आमदार सतेज पाटील यांनी राज्य नेतृत्वावर आपली छबी निर्माण केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला पाच पैकी एकही जागा निवडून आणता आली नाही. हा सतेज पाटील यांच्या नेतृत्वासाठी जबर धक्का मानला जात आहे.

एकीकडे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी नियोजन केले. पण महायुतीच्या नेत्यांना अंगावर घेऊन जोडण्या लावणे, हे आगामी काळात सतेज पाटील यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. तिकडे भाजप मुक्त कोल्हापूर करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असताना जिल्ह्यात एकही जागा काँग्रेसला मिळाली नाही.

ज्या ठिकाणी काँग्रेस डॅमेज झाले त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अयशस्वी झाले. त्याची किंमत विधानसभा निवडणुकीच्या निकालात मोजावी लागली. काँग्रेस मुक्त कोल्हापूर अशी आरोळी महायुतीकडून दिली जात असली तरी जिल्ह्यातील काँग्रेस अद्याप संपलेली नाही. शिवाय गावागावात काँग्रेसचे संघटन आहे. त्यामुळे काँग्रेसची नवी फळी तयार करण्यासाठी सतेज पाटलांसमोर कोणताही मोठा अडथळा नाही.

मात्र, ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसने पाच उमेदवार दिले तेथील विरोधकांना सतेज पाटील यांनी अंगावर घेतले आहे. इतकेच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी राधानगरी आणि शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात जोडण्या लावल्या. त्या ठिकाणी असलेले सहकार क्षेत्रातील मित्र आमदार कोरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारात मित्र शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांच्या देखील मतदारसंघात सतेज पाटील यांच्या सभा गाजल्या आहेत.

या नेत्यांचे आव्हान आता सतेज पाटलांसमोर असणार आहे. इतकंच नव्हे तर शिरोळ, करवीर, हातकणंगले या मतदारसंघातील नूतन आमदारांचे आव्हान असणार आहे. एकंदरीतच पाहता काँग्रेस उमेदवारांच्या पराभवामुळे एकटे पडलेल्या सतेज पाटलांना आता आगामी काळात मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

त्यांचा कसोटीचा काळ आता सुरू झाला आहे. जिल्ह्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पाटील यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनाच याचा फायदा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT