Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Election 2024 : महाविकास आघाडी विधानसभेला 170 पेक्षा जास्त जागा जिंकेल; जयंत पाटलांचे भाकित

Vijaykumar Dudhale

Solapur, 19 july : राज्यात सध्या महाविकास आघाडीची लाट आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जवळपास 170 च्या वर जागांवर जिंकून येईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

आमदार जयंत पाटील (Jayant Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी सोलापूरमध्ये आले होते. त्या वेळी पत्रकार परिषदेत आमदार पाटील यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) विधान परिषद निवडणुकीतील यशाबाबत आताच भाकीत करून टाकले.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या कामकाजावर जनता जास्त नाराज आहे. त्यामुळे राज्यात आम्हाला जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. या सरकारने राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडवत कर्ज काढण्याचे काम केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी एक अर्थसंकल्प आणि लोकसभेनंतर दुसरा अर्थ संकल्प मांडला आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती धोक्यात आणण्याचे काम मागच्या काही वर्षात झालं आहे.

लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनं लागल्यामुळे राज्य सरकार घाबरलेलं आहे. महायुतीचे नेते घाबरलेले असल्यामुळे आता फक्त चंद्र आणून देणंच बाकी आहे. तुम्ही चंद्र मागाल, तर ते चंद्रही आणून देतील. अशा घोषणांच्या माध्यमातून लोकांची तात्पुरती नाराजी कमी करण्याचा प्रयत्न हे करत आहेत, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.

आम्ही महाविकास आघाडी म्हणून आणखी जाहीरनामा काढलेला नाही. मात्र जेव्हा जाहीरनामा काढू, तेव्हा जनतेची सेवा पुढील 5 वर्षांत कशी करणार, याबाबत तपशील देऊ. ज्या लोकउपयोगी योजना आहेत, त्या आमचं सरकार आल्यानंतरही आम्ही थांबवणार नाही, असा शब्दच जयंत पाटील यांनी दिला.

विशाळगड अतिक्रमण जयंत पाटील म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमण दूर करावं यासाठी अनेक शिवप्रेमी हे बराच काळ मागणी करत होते. तिथलं अतिक्रमण पावसाळ्याच्या अगोदर दूर करणे गरजेचं होत. आता ऐन पावसात तिथल्या लोकांना कुठे घालवायचा, हा एक मोठा प्रश्न आहे.

यावर काही लोकांनी कोर्टातून स्टे आणला होता, त्यामुळे तिथल्या 12-13 घरांना काढणे शक्य नव्हते. मात्र, उरलेल्यांना काढावं, असा आदेश आता मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत. पावसाळ्यात अशा लोकांना तिथून काढून टाकणं, हे योग्य नाही. मात्र, अतिक्रमाणाला आमचा पाठिंबा नाही. अतिक्रमण हे दूर झालाच पाहिजे याबद्दल कोणतीही शंका नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील म्हणाले, अतिक्रमण काढण्यासाठी पायथ्याशी जे लोक आले होते, त्यांनी तिथल्या नजीकच्या गावात जाऊन मुस्लिम वस्तीवर हल्ला करणे, घरांची नासधूस करणे, तिजोऱ्या फोडणे आणि मालमत्ता लुटणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनाही अपेक्षित नव्हते. हे काम शिवप्रेमी करू शकत नाहीत, त्यामुळे त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर कलम 153 आणि अधिक कडक कलमं लावली पाहिजेत. काळ सोकावू नये, अशी आमची अपेक्षा आहे.

या प्रकरणात पोलिस जनतेला संरक्षण देण्याबाबत अपयशी ठरले आहेत. फक्त 2 ते 3 पोलिस हे तिथं उघड्या डोळ्यांनी काय होत आहे, ते बघत होते. मोठी कुमक लगेच मागवून गुंडांचा हौदास सुरु असणारा पूर्णपणे थांबवता आला असता, आता आमची मागणी आहे. हा पूर्वनियोजित कट होता, तिथे जाऊन दंगा-गोंधळ करायचं, हे ठरलेलं असावं, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले, कायदेशीर मार्गाने अतिक्रमण काढण्याचे मुख्यमंत्री यांनी आदेश दिले आहेत. तिथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही आहेत, त्यामुळे विशाळगडावर ज्यांनी अतिक्रमण केलं आहे, त्यात हिंदू मुस्लिम दोन्ही आहेत. स्वतः खासदार छत्रपती शाहू यांनी पुढाकार तिथं जाऊन या घटनेचा निषेध केला आहे. तिथे कोणी कोणाला बोलावले, याची ताबडतोब चौकशी झाली पाहिजे. समित्या करायच्या आणि भिजत घोंगडं ठेवायचं, असं कोणताही प्रकार होऊ नये. छत्रपती शाहू महाराज यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यांची भूमिका ही पारदर्शी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT