Mallikarjun Kharge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Akkalkot Constituency : महाराष्ट्रात चोरीचे सरकार सत्तेवर आलेले आहे; मल्लिकार्जून खर्गेंचा घाणाघात

Mallikarjun Kharge : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूलथापांना आता कोणीही बळी पडू नये. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे.

चेतन जाधव

Akkalkot, 13 November : महाराष्ट्रात सत्तेवर आलेले महायुतीचे सरकार हे जनतेतून निवडून आलेले नाही, तर हे चोरीचे सरकार आहे. चोरीच्या मार्गाने आलेले हे सरकार महाराष्ट्राला चांगल्या मार्गावर नेणार नाही, त्यामुळे चोरीचे हे सरकार घालवून महाविकास आघाडीला सत्तेवर आणा, तुम्हाला ‘गुड गर्व्हनन्स’ मिळेल, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिले.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मतदारसंघातील (Akkalkot Constituency) काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची सभा झाली. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील, खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. त्या सभेत बोलताना खर्गे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूलथापांना आता कोणीही बळी पडू नये. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटे बोलून दिल्लीत सत्ता स्थापन केली. सत्तेवर येण्यापूर्वी मोदींनी प्रत्येकाला १५ लाख देण्याचा वादा केला होता. ते अजूनही मिळालेले नाहीत. शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य लोकांची भाजपाने फसवणूक केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ईडी, सीबीआय, सहकार खात्याच्या माध्यमातून लोकांना त्रास देत आहेत. लोकांना भीती दाखवली जात आहे. जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जात आहे, असा गंभीर आरोप मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी या वेळी केला.

काँग्रेसने अनेक संस्था उभ्या करून लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. सहकार, खासगी क्षेत्रात अनेक उद्योग उभे केले आहेत. भाजपने हे सर्व आपल्या मित्रांना विकले आहेत, असा आरोप मल्लिकार्जून खर्गे यांनी केला.

आमचे सरकार आले तर महिलांना सहा सिलिंडर मोफत देणार, तसेच महालक्ष्मी योजनेद्वारे महिलांना तीन हजार रुपये देणार. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा बोनस दिला जाईल. युवकांना नोकरी लागेपर्यंत महिना चार हजार रुपये स्टायपंड, कुटुंबाचे रक्षणासाठी २५ लाखांचा विमा व मोफत औषधे देणार, शंभर युनीट वीज मोफत, तसेच जातीय जनगणना करणार असल्याची ग्वाहीही खर्गे यांनी दिली.

काँग्रेसची सर्वधर्मसमभावाची विचारधारा आहे. मात्र, भाजपकडून जाती-जातीत आणि धर्मा-धर्मांत भांडणे लावण्याचे काम झाले आहे. आरएसएस आणि जनसंघाची विचारधारा ही देशासाठी चांगली नाही. भाजपच्या विचारसरणीमुळे देशात फूट पडत आहे. गांधी-नेहरू घराण्याने स्वातंत्र्यासाठी, देशासाठी बलिदान दिले आहे. भाजप आणि संघाच्या घरातील कुत्रंसुद्धा मेलं नाही, अशी खरमरीत टीका खर्गे यांनी केली.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT