Manoj Jarange Rally Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange Rally : राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात, "जरांगेंची मागणीच चुकीची"

Mangesh Mahale

Maharashtra Politics : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. अंतरवाली सराटीत आज (शनिवार) त्यांनी मराठा आंदोलकांसोबत संवाद साधताना शिंदे-फडणवीस-पवार सरकारला अल्टिमेटम दिला आहे. भाजप नेते, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांची मागणी चुकीची असल्याचे सांगितले. नगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

"जरांगेंच्या आंदोलनाला माझा विरोध नाही. मात्र, ओबीसीमध्ये आरक्षण मागणे योग्य नाही. निजाम काळातील कुणबी दाखले मिळत असतील तर हरकत नाही, पण कुणाच्याही आरक्षणात वाटा नको ही भूमिका हवी," असा सल्ला विखेंनी जरांगे पाटलांना दिला.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "ओबीसींमध्ये आरक्षण मिळावे, ही जरांगेंची मागणी चुकीची आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे ही पहिल्या लढ्यापासूनची मागणी आहे. इतरांच्या आरक्षणातून आरक्षण मिळावे, ही अपेक्षा त्यांनी करू नये,"

"वेगळा प्रवर्ग करून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिले तरी चालेल, पन्नास टक्क्याचं आत आरक्षण द्या, आरक्षण पदरात घेतल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत सरकारला दिला.

"कोण म्हणतं मराठा एक होत नाही, हे या गर्दीने दाखवून दिले,' असे सांगत जरांगेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, कोपर्डीतील तरुणीवर बलात्कार करणाऱ्याला फाशी द्यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT