Ashok Chavan News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ashok Chavan : हे पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव !

Pradeep Pendhare

Nagar News : मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. तसेच आरक्षणासाठी दिवसरात्र संघर्ष ज्यांनी उभा केला आहे, ते मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा करत आहेत. या मराठा आरक्षणामुळे जायकवाडी धरणाला पाणी सोडताना आवश्यक असलेला पोलिस बंदोबस्त मिळत नाही. त्यामुळे पाणी सोडण्याच्या निर्णयाला विलंब होत असल्याचे पत्र प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या पत्रावरून आता वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावर निशाणा साधला आहे. असे पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव आहे. पत्रावर राज्य सरकारने खुलासा करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

नगर-नाशिक जिल्ह्यांत यावर्षी सरासरीपेक्षा 50 टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. दुष्काळाची स्थिती तीव्र आहे. नगर-नाशिकच्या धरणातून पाणी सोडणे म्हणजे, दुष्काळाची तीव्रता अधिक ओढावून घेणे. त्यामुळे नगर-नाशिक धरणातून पाणी सोडू नये, अशी भूमिका राजकीय नेत्यांनी घेतली आहे. या मुद्द्यावर दोन्ही जिल्ह्यांतील नेते न्यायालयात गेले आहेत. परंतु मराठवाड्यातील राजकीय नेते पाणी सोडण्यावरून आग्रही आहेत. आंदोलने सुरू केली आहेत, तर नगर-नाशिकमधून पाणी सोडू नये म्हणूनदेखील आंदोलने सुरू आहेत. तसेच न्यायालयाच्या निकालाचा वेगळा अर्थ काढू नये, असे बजावले जात आहे.

यातच जलसंपदा विभागाने पाणी सोडण्यास विलंब होत असलेल्या मुद्द्यावरून एक पत्र लिहिले आहे. मराठा आंदोलनामुळे पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याने जायकवाडीला पाणी सोडू नये, असे या पत्रात म्हटले आहे. या पत्रावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. या पत्रावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला.

यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या पत्रावरून प्रशासनावर हल्ला चढवला आहे. हे पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव आहे. हे पत्र अशोक चव्हाण यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. हे पत्र म्हणजे धक्कादायक प्रकार आहे. आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. पाण्याच्या प्रश्नावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पाणी सोडण्याचा आणि मराठा आंदोलनाचा काय संबंध? यावर राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

ते पत्र चुकीचे ः गिरीश महाजन

जायकवाडीला पाणी मिळणारच आहे. असे कोणी पत्र लिहिले असेल, तर ते चुकीचे आहे. कायद्यानुसार आणि नियमानुसारच पाण्याचे वाटप होईल. मराठा समाजाच्या आंदोलनाचा आणि जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा काहीदेखील संबंध नाही, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

(Edited By Sudesh Mitkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT