Kolhapur Political News : मराठा आरक्षणावरून कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना गुरुवारी (ता. २६) शहरबंदी करण्याचा इशारा दिल्यानंतर आज सकाळी मुंबईवरून पालकमंत्री परत आल्यानंतर सकल मराठा समाजाने त्यांना रेल्वे स्थानकावरच रोखले.
दिल्लीश्वर साहेबांना मराठा समाजाबद्दल राग असल्याने अद्याप निर्णय घेत नसल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. या वेळी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) कोल्हापूर रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने करण्यात आली. मनोज जरांगे यांनी 40 दिवसांचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. मात्र, त्यांनी ते पाळले नाही. जर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात हिंमत असेल, तर राज्य सरकारसोबत ताबडतोब चर्चा करावी.
त्यांना यापुढे शहरबंदी असेल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. या वेळी मुश्रीफ रेल्वे स्थानकात येताच त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. या वेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. सकल मराठा समाज आक्रमक होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा असून, त्यांच्यासह राज्य व केंद्र सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली. मात्र, आता मराठा समाज फसणार नाही, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. तसंच वेळ पडल्यास पालकमंत्र्यांना कोल्हापूर जिल्हा बंदी करू, असा इशाराही या वेळी मराठा समाजानं दिला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मराठा आरक्षणाबाबत धग कायम आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हातकणंगले, कागल आणि राधानगरी तालुक्यांतील काही गावांमध्ये गावबंदीचा इशारा देण्यात आला आहे. कागल तालुक्यातील हळदवडेत सकल मराठा समाजाने मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना गावात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहेत. लवकरच मराठा आरक्षणावरून मार्ग निघेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने फसवणूक केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळ्या फिती बांधून सकल मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली होती.
या वेळी "चले जाव चले जाव - फसवे सरकार, चले जाव" च्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला, तर महिलांनी सरकारला कोल्हापुरी चप्पल दाखवून निषेध व्यक्त केला होता.
तर राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे आणि आमजाई व्हरवडे गावानेसुद्धा मराठा आरक्षण प्रश्नी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. हातकणंगले तालुक्यातील साजणी गावातदेखील फलक लागला असून, सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, तर लोकप्रतिनिधींना गावात प्रवेशबंदी येथून पुढे सर्व निवडणूक मतदानावर मराठा समाजाकडून बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.