suresh khade, sanjay patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Suresh Khade : राजकारणासाठी नागरिकांच्या जिवाशी खेळ, पूल ऑडिटच्या अहवालावर अजब तोडगा

Anil Kadam

Sangli : मिरजेचा रेल्वे पूल कालबाह्य झाल्याची बाब स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली. दुरुस्तीनंतरही सात वर्षांपर्यंत या पुलाची क्षमता हलक्या वाहनांचा भार पेलण्याचीच असेल, असे अहवालात स्पष्ट म्हटले आहे. मात्र, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांनी हा पूल दुरुस्त करून अवजड वाहनांनाही खुला करू, असा मुद्दा रेटला आहे. त्यामुळे सोयीच्या राजकारणासाठी काढलेला हा पर्याय म्हणजे लोकांच्या जिवाशी खेळ असल्याची टीका होत आहे.

सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामाईजवळच्या पुलाबाबत स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये साऱ्या बाबी स्पष्ट केल्या आहेत. असे असतानाही चांगला पर्याय शोधण्याऐवजी लोकांचा रोष पत्करावा लागू नये, म्हणून धोकादायक मार्गावरून लोकांना नेण्याचे राजकारण सुरू आहे. तज्ज्ञांचा विचार घेण्यापेक्षा सोयीच्या राजकारणाचा विचार स्वीकारण्यात पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) धन्यता मानत आहेत. पालकमंत्री खाडे मागील 14 वर्षांपासून मिरजेचे आमदार आहेत. अनेक वर्षांपासून या पुलावरून प्रवास करीत आहेत, पण त्यांना कधी पुलाचा कार्यकाल आणि दर्जा याबाबत प्रश्न निर्माण झाला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ऑडिटमध्ये पूल वापराबाबत आक्षेप

मिरजेच्या पुलाची दुरुस्ती केल्यास त्याचे आयुष्य 5 ते जास्तीत जास्त 7 वर्षे राहील. दुरुस्तीनंतरही हा पूल केवळ हलक्या वाहनांसाठीच वापरता येऊ शकतो. अवजड वाहनांसाठी हा पूल यापुढे वापरणे धोकादायक आहे. पुलाचे स्टील गंजले असून सिमेंटही सुटत आहे. त्यामुळे या पुलाचा किती वापर करायचा, याबाबतचा विचार करण्याची गरज असल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये म्हटले आहे.

पूल न पाडता दुरुस्त करा...

मिरजेच्या कृपामाई रुग्णालयाजवळील पूल दुरुस्त करण्यात येणार आहे. हा पूल न पाडता दुरुस्ती अशा प्रकारची करायची की त्यावरून अवजड वाहतूकही होऊ शकणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टनुसार केवळ हलक्या वाहनांसाठीच उड्डाणपूल सुरू ठेवण्याचा पर्याय अमान्य असल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले आहे.

रेल्वे प्रशासन दोषी?

पूल बांधल्यापासून आजवर त्याची डागडुजी, रंगरंगोटी केल्याचे कधीही पाहिले नाही. कालबाह्य झालेल्या पुलाची कल्पना रेल्वे अधिकाऱ्यांनी अगोदर का दिली नाही? रेल्वे प्रशासनाचा कारभार भोंगळ पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नास तेच जबाबदार आहेत, असा आरोप खासदार संजय पाटील यांनी केला आहे.

रोष टाळण्यासाठी उपाय...

बांधकाम विभागाच्या नियमानुसार छोट्या पुलांचे त्रैवार्षिक, मोठ्या पुलांचे वार्षिक स्ट्रक्चरल ऑडिट होत असते. रेल्वेच्या बांधकाम विभागाने आजवर या पुलाचे केलेले परीक्षण समोर का आणले नाही? आयुष्यमान संपल्यानंतर त्याच वेळी अहवाल का दिला गेला, असे सवाल बांधकाम तज्ञांनी व्यक्त केला आहे. या परिस्थितीत पालकमंत्री खाडे व खासदार संजय पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर लोकांचा रोष टाळण्यासाठी हा पूल दुरुस्त करून अवजड वाहनांनाही खुला करु, असा मुद्दा रेटला आहे.

(Edited By Roshan More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT