Chandrakant Jadhav
Chandrakant Jadhav Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजपने मनाचा मोठेपणा दाखवून चंद्रकांत जाधवांच्या पत्नीला बिनविरोध विधानसभेत पाठवावे

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने (BJP) मनाचा मोठेपणा दाखवावा आणि कोल्हापूर उत्तरचे कॉंग्रेस पक्षाचे (Congress) दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची बिनविरोध निवड करावी, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते हसन मुश्रीफ यांनी केले. (MLA Chandrakant Jadhav's wife Jayashree Jadhav should be elected unopposed in the Assembly: Hasan Mushrif)

कोल्हापुरात काँग्रेस कार्यालयात शनिवारी (ता. ४ डिसेंबर) दुपारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षाला वरील आवाहन केले आहे. मुश्रीफ म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत चंद्रकांत जाधव यांनी उद्योग, राजकारण तसेच समाजकारणात नावलौकिक मिळविला होता. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्टीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, अशी त्यांची इच्छा होती. विकासाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॉंग्रेसने पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना तिकीट द्यावे. अर्थात हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्‍न आहे. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका भाजपने बिनविरोध केल्या आहेत, त्यामुळे येथेही त्यांनी असाच मनाचा मोठेपणा दाखवावा.

(स्व.) आमदार चंद्रकांत जाधव यांना अपेक्षित असलेले उद्योगकेंद्र शाहू मिलच्या जागेत उभारण्यासाठी निश्चितपणे पुढाकार घेण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, आमदार चंद्रकांतअण्णा जिद्दी व्यक्तीमत्व होते. कामगार ते अब्जाधीश उद्योजक अशी त्यांनी मजल मारली. त्यांचा अकाली मृत्यू पाहता ‘देव आहे की नाही’ अशी शंका निर्माण होते. गरिबांशी असलेली कणव ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांच्यावर उपचार नीट झाले नाहीत का असे मला फोन आले. मात्र, ठामपणे सांगतो की जगातील सर्वांत मोठे डॉक्टर तेथे उपस्थित होते. अण्णांचे प्रत्येक घटकाबरोबर ऋणानुबंध होते. मुंबईत अडीचशे लोकांच्या शस्त्रक्रिया त्यांनी मोफत केल्या आहेत.

हद्दवाढीसह, विजरात सवलत यासह अनेक विकासाच्या संकल्पना आमदार जाधव यांच्याकडे होत्या, असे खासदार मंडलिक यांनी नमूद केले. कॉंग्रेसच्या राज्यस्तरावरील बैठकीत जाधव यांनी आपली मते ठामपणे मांडली होती, अशी आठवण पी. एन. पाटील यांनी सांगितली. आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘अभ्यासू व्यक्तीमत्व आपण गमावले असून उद्योजकांच्या प्रश्‍नांची त्यांना जाण होती,’ असे सांगितले. तेरा ते पंधरा वर्षाखालील फुटबॉल खेळाडूंसाठी ॲकॅडमी सुरू करून आंतरराष्टीय दर्जाचे खेळाडू घडविणे हीच अण्णांना श्रद्धांजली ठरेल, असे विजय देवणे यांनी सांगितले. महेश जाधव यांनी अण्णांच्या अचानक जाण्याने पोकळी निर्माण झाल्याचे नमूद केले. निलोफर आजरेकर यांनी जाधव यांच्या पश्चात जयश्री जाधव यांनी त्यांचे कार्य पुढे न्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या वेळी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे. खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमूख विजय देवणे, संजय पवार, उत्तरचे शहरप्रमूख जयवंत हारूगले, राष्टवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, व्ही. बी. पाटील, माणिक मंडलिक, विक्रम जरग, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भाजपचे महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिक्कोडे आदि उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT