MNS Campaign Ek Sahi Santapachi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MNS Campaign Ek Sahi Santapachi : 'मनसे' च्या 'संतापा' वर राष्ट्रवादी-शिवसेनेची स्वाक्षरी ; राजकीय घडामोडींबाबत राग..

सरकारनामा ब्यूरो

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकारणातील घडामोडी पाहता 'राजकारणाचा एकूण चिखल झाला आहे,' अशी टीका करीत "एक सही संतापाची" असे अभियान राज्यभर राबवले आहे.

“एक सही संतापाची" या अभियानाचा एक भाग म्हणून पाथर्डी तालुका मनसेच्या वतीने पाथर्डी शहरातील स्व.वसंतराव नाईक पुतळा चौकात मोठा फलक लावत त्यावर सद्य परिस्थितीवर सही करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

या अभियानात अवघ्या दीड तासातच पाचशेच्या वर नागरिकांनी सह्या करून आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली. या अभियानात सर्वच जण सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या संतापाची मोहर सहीच्या रूपाने उमटवली.

अनेकांनी आपल्या मार्मिक,तिखट आणि बोचऱ्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. या संतापाच्या सही अभियानात सर्वसामान्य जनते सोबत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनीही सह्या करीत सहभाग नोंदवल्याने सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे.

यात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, युवा सेनेचे सचिन नागापुरे, अनेक गावचे सरपंच यांनी मनसेच्या अभियानात आपली संतापाची सही व्यक्त करत पाठिंबा दर्शवित आहेत.

राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांनी उत्स्फूर्तपणे मनसेच्या अभियानात सही केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र ढाकणे एक जनतेतील नेते असून जनतेच्या प्रश्नांवरील लढ्यात ते नेहमी आक्रमक असतात अशी त्यांची ओळख आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर, तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ आणि मनसे कार्यकर्त्यांनी या अभियानासाठी पुढाकार घेतला होता आणि नागरिकांना सही करत व्यक्त होण्याचे आवाहन केले होते.

आता या आवाहनाला राष्ट्रवादी, शिवसेना(ठाकरे गट), विविध पक्षांचे तालुक्यातील सरपंच यांनीही हातभार लावत मनसेचे आंदोलन यशस्वी केले आहे. विधानसभेच्या अनेक निवडणुकांत राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे आणि मनसेचे देविदास खेडकर एकमेकांच्या विरोधात ठाकलेले आहेत.

काय म्हणाले होते राज ठाकरे..

दोन जुलै रोजी राष्ट्रवादी फुटल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. "देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT