Sharad Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pawar Attack On Modi : महाराष्ट्राला चारा दिला म्हणून मोदींनी ‘अमूल’च्या प्रमुखांवर खटला भरला; पवारांचा हल्लाबोल

Vijaykumar Dudhale

Karmala, 26 April : गुजरातमधील अमूल संस्थेच्या प्रमुखांना आम्ही महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणून दाखवली. त्यांच्याकडून गुजरातमधून चारा आणला आणि पशुधन जगविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. ‘अमूल’ने महाराष्ट्रातील जनावरांना दुष्काळात चारा देऊन मदत केली. पण, महाराष्ट्राला मदत केल्याने ‘अमूल’च्या प्रमुखांवर मोदींच्या राजवटीत खटला भरला गेला. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या जनावरांना चारा देण्याचे काम केले, हा त्यांनी गुन्हा केला होता का? आज तेच मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची धोरणे अशी शेतकरीविरोधी आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) आणि त्यांच्या समर्थकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींवर हल्लाबोल केला. पवार म्हणाले, सोलापूरचा पालकमंत्री असताना १९७२ मध्ये मी जिल्ह्यातील ठिकठिकाणी फिरत होतो. तेव्हा नामदेवराव जगताप आणि शंकरराव मोहिते पाटील यांच्याशी आमचा संवाद असायचा. बाजार समितीच्या गेस्ट हाउसमध्ये मी नामदेवराव जगताप यांच्याशी जिल्ह्यातील आणि करमाळा तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी चर्चा करायचो. जगताप, मोहिते पाटील, विठ्ठलराव शिंदे, औदुंबरअण्णा पाटील यांच्या सहकार्याने आम्ही दुष्काळ हटविण्याचे काम केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्यावेळी उसाचे वाढे हाच चारा होता. मात्र, जनावरे ती खात नव्हती. काही जनावरांच्या तोंडाला तो चारा खाल्ल्याने जखमा झाल्या होत्या. त्यामुळे आम्ही गुजरातच्या अमूल संस्थेच्या प्रमुखांना महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रात येऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गुजरातमधून चारा पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नरेंद्र मोदींनी अमूलच्या प्रमुखांवर खटला भरला, असा आरोप शरद पवार यांनी केला.

कांदा निर्यातीवर सरकारने बंदी घातली. आम्ही लोकांनी काही ठिकाणी मोर्चे काढले, त्यानंतर सरकारने फक्त पांढऱ्या कांद्याला परवानगी दिली आणि लाल कांद्यावरील बंदी कायम ठेवली. आपल्याकडे लाल कांदा पिकवला जातो. जो पांढरा कांदा गुजरातमध्ये पिकतो, त्याचीच निर्यात करण्याची परवानगी दिली. इथेनॉल धोरणाबाबत भाजप सरकारचे असेच धोरण आहे, अशी टीका पवारांनी केली.

पवार म्हणाले, शेतकरीहिताच्या गोष्टी हे सरकार राबवत नाही. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न आज सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्पादन खर्चावर आधरित किंमत देण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र, सरकारकडून असा निर्णय घेतला जात नाही. आम्ही कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती., पण मोदी अशी शेतकरीहिताची धोरणे राबवत नाहीत.

मोदींचा पराभव गरजेचा

मोदींचा पराभव करण्याची आज राजकीय गरज आहे. त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून निवडून द्या. त्यांच्यासाठी एकत्र राहून काम करण्याची गरज आहे, ते काम तुम्ही करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावणार

करमाळा तालुक्यातील ३० ते ४० गावांचा पाणीप्रश्न आहे. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात मला माहिती द्यावी. सध्या आचारसंहिता असल्याने सरकारकडून आज निर्णय होणार नाही. पण, निवडणूक संपल्यानंतर आपण एकत्रित बसून ही उपसा सिंचन मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे शरद पवार यांनी सांगितले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT