Ranjeetsingh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Water Issue : सांगोल्यात पाणी पेटलं; खासदार निंबाळकर म्हणाले, ‘कॅनॉलवर येऊन शेतकऱ्यांना पाणी देईन’

दत्तात्रय खंडागळे

Sangola News : सांगोल्यात सध्या नीरा उजवा कालव्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. नियमानुसार ‘टेल टू हेड’ पाणी न आल्यामुळे शेतकरी आक्रमक होऊन आंदोलन करू लागला आहे. नीरा उजवा कालव्याच्या पाण्याबाबत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लक्ष घातले असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी न मिळाल्यास मी कॅनॉलवर येऊन पाण्याची व्यवस्था करेन, असे आश्वासन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिले आहे. (MP Nimbalkar said, 'I will come to the canal and give water to the farmers)

'पंढरपूर पाण्याचं, मंगुड दाण्याचं व सांगोला सोन्याचं’ असं म्हटलं जातंय. सोन्याच्या सांगोल्याला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता होती. दुष्काळी म्हणून ओळखले जात असलेल्या सांगोला तालुक्याचे राजकारण आतापर्यंत पाण्याभोवतीच फिरत आले आहे आणि सध्याही फिरताना दिसत आहे. सांगोला तालुक्यातील टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी तसेच प्रस्तावित सांगोला उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या कोट्यातून निधीचीही तरतूद केल्याची माहिती आमदार शहाजी पाटील आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी अनेकदा दिली.

सध्या तालुक्यात नीरा उजवा कालव्याचे पाणी सुरू आहे. परंतु हे पाणी नियमाप्रमाणे येथील लाभक्षेत्राला 'टेल टू हेड' मिळाले नाही. टेलकडील गावे पाण्यासाठी आंदोलने करीत आहेत. खरिपाची पेरणी झाल्यानंतर हक्काचे नीरा उजव्याची पाणी वेळेवर मिळेल. आपली पिके जोमात येतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण, पाण्याभोवती राजकारण फिरणाऱ्या सांगोल्याला सध्या पाण्यातच राजकारण मुरतंय का, काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. यापुढे सांगोल्यातील शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आंदोलन करावे लागणार नसल्याचे लोकप्रतिनिधींनी अगोदर सांगितले आहे.

खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना पाण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंतांनी स्वतः लक्ष घालण्याचे सांगितले आहे. कार्यकारी अभियंताही प्रत्यक्षात या पाण्याच्या नियोजनासाठी सांगोला तालुक्यात आले आहेत. आमदार शहाजी पाटील यांनीही या पाण्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. परंतु नियमानुसार फाटा क्रमांक आठवरील लाभक्षेत्रातील शेवटच्या असणाऱ्या गावांना अद्याप पाणी काही मिळाले नाही.

पाण्यातच मुरतंय राजकारण

नीरा उजवा कालव्याच्या पाण्याबाबत सध्या 'कही खुशी, कही गम' अशी अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे. काही भागात पाणी सुरू असून येथील शेतकरी सुखावला आहे. नियमाप्रमाणे टेलला असलेल्या फाटा क्रमांक आठच्या गावांना अद्यापही पाणी मिळाले नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आम्हाला आमच्या हक्काच्या नियमाप्रमाणे पाणी का मिळत नाही, असे शेतकरी बोलत आहेत. या अगोदर पाण्याभोवतीच राजकारण फिरणाऱ्या सांगोला तालुक्यात ‘पाण्यातच राजकारण मुरतंय' अशी अवस्था झालेली दिसून येत आहे.

पाण्यासाठी लढत होतो, लढत राहणार

नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासंदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले की, माझ्या लोकसभा मतदारसंघातील पाहण्यासाठी मी नेहमी लढत राहिलो आहे, यापुढे लढत राहीन. सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी त्यांना मिळवून देण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असेन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT