Sharas Pawar, Udayanraje Bhosale
Sharas Pawar, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजेंचे थेट पवारांनाच आव्हान : `रयत` च्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांना नेमण्याची मागणी

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण करणे म्हणजे रयतेला फुली मारण्यासारखे आणि एका कुटुंबाला महत्व देण्यासारखे आहे. `रयत`मध्ये सत्तेचे केंद्रीकरण सुरू असून वडाच्या झाडाचे केंद्रीकरण किंवा खासगीकरण झाले तर हा वटवृक्ष वठणार आणि त्याला वाळवी लागेल, असा इशारा खासदार उदयनराजे यांनी दिला.

आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होण्याचा घाट असल्याबद्दल उदयनराजेंनी मते मांडली. खासदार उदयनराजे म्हणाले की, असे झाले तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल. रयत शिक्षण संस्थेची घटना कर्मवारी अण्णांनी केली होती. त्याच्या आधारावर संस्थेची स्थापना झाली होती. पण असे काहीतरी घडलंय की अण्णांच्या विचारांशी फारकत घेण्यात आली आहे.

रयत शिक्षण संस्थेच अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच हवे आहेत, असा मुद्दा उपस्थित करून त्यांनी शरद पवारांच्या अध्यक्षपदाबद्दल आक्षेप घेतल्याचे दिसून येत आहे. श्री. पवार हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, लोकांच्या प्रवाहाच्या विरोधाच्या दिशेने मतांची मांडणी करत असाल तर ती चूकच आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना १९१९ साली कर्मवीर अण्णांनी केली. त्यांचा जन्म कोल्हापूरात झाला असला तरी कर्मभूमी सातारा होती.

थोरले प्रतापसिंह महाराजांनी यांनी सातारच्या राजवाड्यात त्या काळात पुरोगामी विचार म्हणून मांडणी केली. राजवाड्यात त्यांनी शाळा सुरू केली. मुलांबरोबर स्त्रीयांकरित सर्वात प्रथम शिक्षणाची दालने त्यांनी खुली केली. त्यातून प्रेरणा घेऊन महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत पुढे नेली. थोरले प्रतापसिंह महाराजांनी दिलेल्या विचारातून प्रेरणा घेऊन आण्णांनी 'रयत'ची स्थापना केली. सर्वसामान्य कुटुंबातील कोणतेही मुलं शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत. तोच विचार घेऊन अण्णांनी वाटचाल केली.

याविषयीची एक आठवण सांगता उदयनराजे म्हणाले, मी लहान असताना कर्मवीर आण्णा आमची आज्जी राजमाता सुमित्राराजे भोसले यांना भेटण्यासाठी येत असत. त्यांची चर्चा काय होत होती मला माहित नाही. पण, सातारा राजघराण्याचे मोठे योगदान रयतच्या स्थापनेत आहे. त्यासाठी लागणारे सहकार्य असेल जमिनी असेल वाटेल ते सहकार्य दिले. रयत शिक्षण संस्थेची घटना त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचे राजकारण या संस्थेत येऊ नये म्हणून यासंस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री सत्ता कोणाची असो असावा, अशी सूचना त्यांनी केली.

जेणेकरून शासनाचे शिक्षण धोरणातून फायदा सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना व्हावा, ही त्या मागची मुलभूत कल्पना होती. `कमवा आणि शिका` ही योजना सुंदर आहे. प्रत्येकाने शिक्षण घेत असताना कमवावे, हा पुरोगामी विचारच म्हणावा लागेल. आज पाहिले तर ज्या ज्या लोकांचे योगदान आहे. ज्या लोकांना मेंबर म्हणून कसे घेतले जाते हे मला माहिती नाही. अनेकांनी मला बोलून दाखविले की आम्ही या संस्थेसाठी इतके झटलो आमच्या कुटुंबातील कोणी नाही. साधे आमच्या कुटुंबाचे इतके मोठे योगदान असताना आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला रयत शिक्षण संस्थेत सभासद म्हणून मान्यता दिलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मला कार्यकारिणीवर घ्या, असा माझा अट्टाहास नाही. आम्हाला मतदानाचा अधिकार देखील देऊ नका. निदान ज्याला आपण कृतज्ञता म्हणतो, ते तरी दाखवा, असे सांगून उदयनराजे म्हणाले, आमच्या कुटुंबाचे योगदान असूनही ऑनररी मेंबर म्हणून सुध्दा घेतले नाही. मी विचारणा केल्यावर म्हणाले की आम्हाला बोर्डासामोर ठेवावे लागले. बोर्डाने मान्यता दिली तरच ते करता येईल, असे संस्थेच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्याने सांगितल्याचे उदयनराजे म्हणाले.

सध्या' रयत'ची व्याख्या बदलली आहे. आम्हाला रयत शिक्षण संस्थेवर घेऊ नका. पण, आता हे लोकांनी ठरवावे. ही संस्था रयतेची आहे. कोणाच्या एका खासगी कुटुंबाची नाही. आम्हालाही म्हणता आले असते आजोबा, आजीने ठरविले असते तर ही संस्था आमची असती. कोणीही अडविले नसते. शिवाजी महाराजांपासूनचे आमचे विचार आहेत. व्यक्तीकेंद्रीत कुटुंब नाही. त्यांनी समाजाच्या हिताचा विचार मांडला तोच आम्ही जोपासत आहोत. आमचा कुठे सदस्यत्वासाठी अर्ज आला, असे विचारले जाते. वाईट वाटते. आम्ही वाईट वाटून घेतले नाही. उत्तर काय मिळणार, हे माहिती होते, असे त्यांनी सांगितले.

सभासद होण्यासाठी की मर्जी पाहिजे, हे घातक आहे. थोरले प्रतापसिंह महाराज, फुले कुटुंब, अण्णांचे विचार सर्वसामान्यांना शिक्षण मिळाले पाहिजे हा त्यांचा हट्ट होता. आज खासगीकरण म्हणजे 'रयत'ला फुली मारण आहे. कुटुंबाला महत्व म्हणजेच केंद्रीकरण आहे. वडाच्या झाडाचे केंद्रीकरण किंवा खासगीकरण झाले तर वठणार आणि वाळवी लागेल. असे होऊ नये पण, झाले तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. ही माझी संस्था खासगी संस्था असे कोणी म्हणाले आणि ती पूर्व दिशा ठरली तर ते चुकीचे होईल.

खासगीकरणातून डोनेशन संस्कृती येणार. मूठभर लोकांच्या हातात सत्तास्थाने येणार, असा धोका त्यांनी व्यक्त केला. ही शिक्षणसंस्था रयतेची आहे ती रयतेची राहिली पाहिजे. पण असे होताना दिसत नाही. या संस्थेची घटना बदलली की नाही? पदसिद्ध अध्यक्ष कोणीही असोत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच संस्थेचा अध्यक्ष असावा. या शिक्षण संस्थेत राजकारण येता कामा नये. मला कोणाच्या विरोधात बोलायचे नाही. पण मी परखड मत व्यक्त करतो, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.

रयतच्या वटवृक्षाला वाळवी कुठली लागली, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ''वाळवी ही वाळवीच असते. याविरुद्ध सातारा जिल्ह्यातील बाकीचे लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत. त्यांनी बोलावे. रयतेच हेड ऑफिस जिल्ह्यात राहिले पाहिजे.'' अजित पवार व शरद पवारांवर टीका करण्यामागचे नेमके कारण काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, मी कोणाचे नाव घेऊन टीका करायला मी त्यांना मोठे करत नाही. मी मत मांडले की माझ्यावर केसेस केल्या, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT