Kolhapur Municipal Corporation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : एका दाव्याने महापालिकेची गोची अन् घेतला मोठा निर्णय; ठाकरे गटाची हक्काची जागा गेली

Shivsena UBT Vs Mahayuti : कोल्हापूर महापालिकेत महिला बालकल्याण समितीच्या कार्यालयावर एकाच वेळी महायुती व शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. यामुळे कार्यालयाचे उद्‍घाटन रखडले.

Aslam Shanedivan

  1. महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या कार्यालयावरून महायुती आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला.

  2. वाद टाळण्यासाठी प्रशासनाने कार्यालयाचे उद्घाटन पुढे ढकलले आणि जागा दोघांनाही न देण्याचा निर्णय घेतला.

  3. ठाकरे गटाच्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी आधीच कार्यालयाचे नूतनीकरण केले होते.

Kolhapur politics : महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या कार्यालयाच्या महायुती व शिवसेना ठाकरे गटातील वादातून आज ठाकरे गट नेत्यांच्या कार्यालयाचे उद्‍घाटनच पुढे ढकलले. दोन्ही पक्षांकडून केलेल्या दाव्यांमुळे आणखी वाद होऊ नये, म्हणून ते कार्यालय दोघांनाही न देण्याचा निर्णय घेतला.

महिला बालकल्याण समितीचे कार्यालय असलेली जागा शिवसेनेच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे यांना प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्याप्रमाणे त्यांनी नूतनीकरण करून घेतले. स्वतः काही खर्च उचलला. त्याचे काम सुरू असताना विविध समितींच्या सभापती निवडी झाल्या. त्यानंतर महिला बालकल्याण समिती सभापतींसाठी ते कार्यालय मिळावे, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू झाले.

गेल्या महिन्यात त्याबाबत दोन्हीकडील शिष्टमंडळे भेटली. त्यावर तोडगा निघालेला नव्हता. तोपर्यंत विरोधी पक्षनेते, काँग्रेस गटनेते, शिवसेना गटनेते यांच्या कार्यालयाचे उद्‍घाटन आज करण्याचे नियोजन केले होते. वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही माहिती दिली होती.

पण कार्यालयाबाबत महायुतीतून आग्रह झाल्याने महापौर रूपाराणी निकम यांनी कार्यालय दोघांनाही न देण्याचे निर्देश दिले. उत्तुरे यांनीही कार्यालयावरून काही वाद होऊ नये, म्हणून प्रतीक्षा करण्याचे ठरविले. त्यामुळे आज होणारा उद्‍घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला.

वादापाठीमागे कोण?

महापालिकेच्या इमारतीत कार्यालये असताना विशिष्ट जागेबाबतच आग्रह धरण्यामागे स्वयंघोषित कारभारी असल्याची चर्चा महापालिकेत होती. विकासकामे करण्यासाठी आलो आहोत की कार्यालयासाठी भांडण्यासाठी आलो आहोत, अशीही चर्चा नगरसेवकांत आहे.

सर्वांचीच सामंजस्याची भूमिका हवी

उद्‍घाटनासाठी आलेले आमदार सतेज पाटील म्हणाले, निवडणुकीपर्यंत राजकारण करण्यास हरकत नाही. निवडणूक झाल्यानंतर थोडा संघर्ष असतो. दुसऱ्या बाजूला ३५ चा आकडाही मोठा आहे. महायुतीचे महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती साऱ्यांनीच सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. निवडून आल्यानंतर शहर विकसित कसे होईल?, वाहतूक समस्या कशा सोडवता येतील?, यासाठी महाविकास आघाडी म्हणून सहकार्याची भूमिका आहे.

FAQs :

1. हा वाद कशावरून निर्माण झाला?
महिला बालकल्याण समितीच्या कार्यालयाच्या जागेवरून वाद निर्माण झाला.

2. उद्घाटन का पुढे ढकलले गेले?
दोन्ही गटांमध्ये वाद वाढू नये म्हणून उद्घाटन पुढे ढकलले गेले.

3. प्रशासनाने काय निर्णय घेतला?
कार्यालयाची जागा दोन्ही गटांना न देण्याचा निर्णय घेतला.

4. प्रतिज्ञा उत्तुरे यांचा या प्रकरणात काय संबंध आहे?
त्यांना आधी प्रशासनाने जागा दिली होती आणि त्यांनी नूतनीकरणही केले होते.

5. या वादाचा पुढे काय परिणाम होऊ शकतो?
स्थानिक राजकारणात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT