Kalyan Kale, Deepak Pawar
Kalyan Kale, Deepak Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; दीपक पवारांचे, कल्याण काळेंवर गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर खर्डी : पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पंढरपूर खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखाना उभारणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये घेतले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचेच माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार (Deepak Pawar) यांनी केला आहे.

या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळाला नाही. शेअर्स म्हणून घेतलेले शेतकऱ्यांचे पैसे येत्या गुडीपाढव्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केल्यास आपण स्वखर्चातून कल्याणराव काळे यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सत्कार करु असे खुले आव्हान दीपक पवार यांनी आज येथे दिले. यानंतर पंढरपुरातील राष्ट्रवादीअंतर्गत सुरु असलेला वाद आणखी चव्हाट्यावर आला आहे. सिताराम महाराज साखर कारखान्याच्या शेअर्सच्या रक्कमेवरुन कल्याण काळे आणि दीपक पवार यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

कल्याण काळे यांनी आपल्या खासगी सिताराम महाराज साखर कारखान्याची अलीकडेच विक्री केली आहे. त्यानंतर कारखाना उभारणीसाठी शेअर्स म्हणून घेतलेले पैसे परत द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी लावून धरली आहे. यावरुन काळे-पवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

अलीकडेच दीपक पवार यांनी कारखाना विक्रीची चौकशी करावी अशी तक्रार ईडी व सीबीला दिली होती. त्यानंतर कल्याण काळे यांनी दीपक पवार हे जाणून बुजून साखर कारखाने अडचणीत यावेत यासाठी खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप करत येत्या सहा महिन्यात शेतकर्यांचे पैसे परत करु असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज दीपक पवार यांनी पुन्हा काळेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत, सिताराम महाराज कारखान्यासाठी घेतलेले पैसे परत देण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात आज पंढरपुरात शेअर्स धारक शेतकऱ्यांची बैठक पार पडली. शेतकऱ्यांचे पैसे परत मिळेपर्यंत आपण हा लढा सुरुच ठेवणार असल्याचे दीपक पवार यांनी बैठकीत सांगितले. या वेळी पवार म्हणाले, कल्याण काळेंच्या कार्यकाळातच सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाला. कोणत्या कारणासाठी त्यांनी कर्जाचा वापर केला हे सभासदांना सांगावे. शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर बॅंकेचे कर्ज काढून सिताराम महाराज साखर कारखान्यासाठी पैसे घेतले. 12 वर्षानंतरही शेतकऱ्यांना नासभासदत्व मिळाले ना पैसे. शेतकऱ्यांच्या पैशातून उभा केलेल्या या कारखान्याची विक्री केली आहे. विक्री केल्यानंतर तरी शेतकऱ्यांचे पैसे परत मिळणे अपेक्षित होते. परंतु पैसे परत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. शेतकऱ्यांचे शेअर्सचे पैसे व्याजासह परत मिळवण्यासाठी आपण हा लढा सुरु केला आहे. शेवटच्या शेतकऱ्यांला पैसे मिळणेपर्यंत हा लढा सुरु ठेवणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

यामध्ये कोणतेही राजकारण नाही. सभासदांनी डोळसपणे आपल्या हक्काचे पैसे मागावेत. शेतकऱ्यांचे पैसे परतमिळावेत यासाठी सीबीकडे लेखी तक्रार केली आहे. सीबीने दखल घेतली असून चौकशीसाठी दोन अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. लवकरच कंपनी कादयाद्यानुसार कारवाई सुरु होईल. तरीही कल्याणराव काळे यांनी गुडीपाढव्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांचे पैसे व्याजासह जमा केल्यास आपण त्यांचा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सत्कार करु असेही पवार यांनी यावेळी जाहीर केले. पवारांचे हे आव्हान काळे स्विकारणार का याकडेच तालुक्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. बैठकीला विठ्ठलचे माजी संचालक मधुकर गिड्डे, धनंजय पाटील, प्रकाश पाटील, अतुल करांडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT