Raj Thackeray, Sharad Pawar
Raj Thackeray, Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शरद पवारांनी दिलं राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर, म्हणाले…

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : ''राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना महाराष्ट्रात जातीयवाद हवा आहे,'' असे विधान शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. ते कोल्हापुरात आज पत्रकार परिषदेत बोलत होते. (ncp sharad pawar responds to mns raj thackerays criticism)

''राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. राष्ट्रवादीने दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करायला लावला. त्यामधून समाजात फूट पाडली जात आहे,'' असा घाणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात केला.

''राष्ट्रवादीला जातीयवाद हवा आहे की नाही, याबाबत राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षातील राष्ट्रवादीचा इतिहास तपासावा. राज ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य नसते,'' असा टोला पवारांनी यावेळी राज ठाकरेंना लगावला. ''जाती-पातीच्या पलिकडे जाऊन आपण भारतीय आहोत ही भावना रुजवायला हवी,'' असे पवार म्हणाले.

राज ठाकरेंवर शरद पवार म्हणाले, “बरेच महिने हे कुठे भूमिगत झाले होते, याचा काही कुणाला अंदाज येत नव्हता. त्यांचं हेच वैशिष्ट आहे की, दोन-चार महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन-चार महिने काय करतात मला माहीत नाही. ”

''राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म १९९९ मध्ये झाला, तेव्हापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. पूर्वी जात होती. पण ती अभिमानाची गोष्ट होती. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करायला लावला. समाजामध्ये फूट पाडली जाते. इतिहास वाचायचा नाही. इतिहास लिहिला कोणी तर बाबासाहेब पुरंदरे यांनी. तर मग तो चुकीचा आहे; कारण पुरंदरे हे सॉफ्ट टार्गेट आहेत,'' असे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात काल म्हटलं.

राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणाचा समाचार राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी घेतला आहे. आव्हाडांनी टि्वट करुन राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ''प्रबोधनकारांची पुस्तक वाचली तर जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच ... हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात,'' असा टोला आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

''जातीपातीचे राजकारण आपण कधी बंद करणार आहेत, झेंडा पाहून घ्या एकदा ..विषय संपला..नीळा, भगवा, हिरवा,'' असा प्रश्न आव्हाडांनी ठाकरेंना टि्वट करुन विचारला आहे. ''महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा,'' अशा शब्दात आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.

''प्रबोधनकारांची पुस्तक वाचली तर जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच ... हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात,'' असे आव्हाडांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT