Eknatha Shinde, Anil Babar, Ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Ajit Pawar : आमचं ठरलंय, अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष करणार बंड!

सरकारनामा ब्यूरो

अनिल कदम

Sangli : 'सांगली जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाचे किमान तीन आमदार निवडून आणू. खानापुरात आमचं ठरलंय. यावेळी बदल घडणार. भले मैत्रीपूर्ण लढत द्यावी लागेल मात्र आमदार आपलाच असेल, असे सांगत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बंडाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या विरोधात वैभव पाटील यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत.

कुंडल येथे पलूस तालुका राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या संवाद मेळावा झाला. या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुक लढण्याचे संकेत दिले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याचे कळताच आनंदाने स्वतःला चिमटा काढून घेतला. महाराष्ट्रच्या विकासात देशाबरोबर जायचे असेल तर केंद्रीय नेतृत्वाबरोबर जाणे गरजेचे होते. हा निर्णय तुमच्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान वाढवण्यासाठी गरजेचा आहे. हा निर्णय अजितदादांनी घेतला. सत्ता नसल्याने कार्यकर्ते अस्वस्थ होते. मरगळ आली होती. त्यामुळे बदल गरजेचा होता, असे वैभव पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मेळाव्याला 'युवक'चे उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाटील यांच्यासह ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष संजय कोळी, अविनाश चोथे, केदार पाटील, कृष्णात मोकळे, दिशांत धनवडे, विटा शहर उपाध्यक्ष रामदास दौंडे, सुनील पवार, चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीत वाद होणार?

जिल्हाध्यक्ष पाटील यांनी तालुका निहाय अजित पवार गटाच्या बैठका सुरू केल्या आहेत. खानापुरातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार अनिल बाबर(Anil Babar) यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत त्यांनी दिले आहेत. यावेळी बदल घडणार असून आपलाच आमदार होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, विद्यमान आमदार मित्र पक्षाचा असताना पाटील असे उघडपणे बोलत असल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

मोठा नेता आला नाही ते बरे झाले

आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता वैभव पाटील म्हणाले, "कोणत्याही पक्षाचा एकही नेता असा नाही, ज्याचे अजितदादांनी काम केले नाही. जिल्ह्यातील मोठा नेता पक्षात आला नाही म्हणून बरे झाले. नाहीतर पुन्हा आपल्याला कोपऱ्यात जाऊन बसावे लागले असते, आज दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. स्वाभिमानाने राजकारण करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळाले आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT