CPI Tukaram Bhasme
CPI Tukaram Bhasme Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मोदींनी ज्या संसदेच्या पायरीवर डोके टेकवले, त्यांनी तिच संसद पाडली

अमित आवारी

CPI Vs BJP : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अहमदनगर जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन आज अहमदनगर शहरातील शिवपावन मंगल कार्यालयात सुरू झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन भाकपचे ( CPI ) राज्य सरचिटणीस कॉम्रेड तुकाराम भस्मे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.

या अधिवेशनाला भाकपचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे, जिल्हा सचिव अॅड. शांताराम वाळुंज, सहसचिव अॅड. सुधीर टोकेकर, महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्ष स्मिता पानसरे, अहमदनगर महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अऩंत लोखंडे, संतोष खोडदे, भारती न्यालपेल्ली, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बहिरनाथ वाकळे, बन्सी सातपुते, कारभारी उगले, रामदास वागस्कर, दत्ता वडवणीकर, प्रा. मेहबुब सय्यद आदी उपस्थित होते.

तुकाराम भस्मे म्हणाले, ज्या कालखंडात आपण राजकारण करत आहोत. त्यावेळची राजकीय परिस्थिती चळवळींचे दमण करणारी आहे. देशातील एक पक्ष स्वतःला जागतिक पातळीचा समजू लागला आहे. त्यांचा भारतीय स्वातंत्र्याशी संबंध काय? आमच्या पक्षाचे केवळ अमरावती जिल्ह्यात 12 स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांच्याकडे देशभरात नावाला तरी कोणी सापडते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत भाजपवर टीका केली.

ते पुढे म्हणाले की, जगातील आर्थिक स्थिती झपाट्याने बदलत आहे. जागतिकीकरणाचे परिणाम भारत व जगाला जानवत आहेत. श्रीलंकेला भारताने मदत केली त्याचे काय झाले? लोकांच्या चळवळीवर विश्वास ठेवणारे लोक एकत्र येत आहेत. 2014पासून आरएसएस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यासाठी जनतेत जे गारूड घातले त्यातून अनेक गैरव्यवहार पुढे येत आहेत. युपीए 2च्या विरोधात महागाई आंदोलन करून सत्तेत आले आता काय करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

दांभिकपणे बोलून लोकांच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस, ईडी, सीबीआयचा दूर उपयोग करून सत्ता, मंत्रिपदे मिळविली जात आहेत. देशात तंत्रज्ञानाचा विकास होऊनही जगात भारताचा क्रमांक 110वा आहे. भाजप हे महाविकास आघाडीवर टीका करत आहे. महाचोरांनी चोराला चोर म्हणावे का? महाचोर व चोरांना नावे ठेवण्याचा अधिकार आम्हाला आहे. मोदींनी पंतप्रधान सहाय्यता निधीच्या पैशाचे काय केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आम्ही फार थोडे असलो तरी फार भयंकर आहोत. देशासाठी कोण झगडले याचा इतिहास जरा तपासून पहा. देशाला हुकुमशाही मान्य नाही. देशात धर्म व जातीच्या राजकारणाची गरज काय? भांडवलशाही प्रबळ झाली की धर्म व जातीचे राजकारण सुरू होते. 2014पर्यंत जागतिक भांडवलदारांच्या यादीत भारतातील भांडवलदार नव्हते. मोदी सत्तेत येताच आदाणी, अंबाणी जागतिक भांडवलदारांच्या यादीत आले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची खूप चर्चा झाली. मात्र आदाणी, अंबाणींचे 10 लाख कोटींचे कर्ज माफ केले त्याचा डंका का केला नाही. मोदींनी प्रथम पंतप्रधान झाल्यावर ज्या संसदेच्या पायरीवर डोके ठेवले तिच संसद पाडून नवीन संसद इमारत बांधायला काढली, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाकप धर्म निरपेक्षतेचा पुरस्कार करतो. धर्म, जात हे खासगी विषय आहेत. त्यांचे भांडवल करण्याचे काम भाजपने केले. देशात हिंदूंची संख्या जास्त आहे. हिंदूंचे सरकार हिंदूंना पेट्रोल 25 रुपयांना देणार का, त्यांच्यासाठी पेट्रोल पंपावर वेगळी व्यवस्था नाही. सर्वांसाठी एकच पेट्रोल एकाच दराने मिळते. तरी राजकारणात जात व धर्म आणले जातात, असे त्यांनी सांगितले.

आनंत लोखंडेंनी गायिली गीते

महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी पहाडी आवाजात चांदणाची छाया कापराची माया, समतेच्या वाटेने यावे ही दोन गीते गाऊन उपस्थितांची दाद मिळविली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT