Jayant Patil-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil On Cabinet Expansion : 'दोन महिने का होईना आम्हाला मंत्री कराच'; महायुतीच्या आमदारांच्या भूमिकेवर जयंत पाटलांचे बोट

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 July : महायुतीचे सरकार पुन्हा येईलच याची खात्री नाही, त्यामुळे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दोन महिने का होईना आम्हाला मंत्री करा, अशी आमदारांची भूमिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवर भाष्य केले.

महायुती (Mahayuti) सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार परत होणार नाही, ही शेवटची संधी आहे, असं काही आमदारांना वाटतं. आमच्या मंत्रिपदाचे (Minister) स्वप्न किमान दोन महिने तरी पूर्ण होऊ द्या, असे बरेच आमदार मागे लागले आहेत.

काही असंतुष्ट आत्मे, संतुष्ट करण्याचा सरकारचा हा शेवटचा प्रयत्न आहे. कारण परत सरकार येईल, याची खात्री नाही. सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोड्या दिवसांसाठी तरी मंत्री करा, असं म्हणणाऱ्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

राज्य सरकार कशा पद्धतीने चालवायचं, याच्या काही परिसीमाच उरलेल्या नाहीत. हे भेदरलेलं आणि घाबरलेलं सरकार आहे. आपला पराभव होईल; म्हणून येन केन मार्गाने पाहिजे ते करण्याचा प्रयत्न आहे. पुढील आठ दिवसांत आणखी काही नवीन योजना येतील, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये जोपर्यंत विधानसभेच्या जागे बाबत चर्चा होत नाही, तोवर आम्ही मतदारसंघाबाबत बोलणार नाही. मात्र, ज्या ज्या मतदार संघात आम्ही निवडणूक लढवणार आहोत, तिथे मेळावा घेत आहोत.

शिवसेनेच्या मुंबईतील विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर जयंत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ज्या त्या पक्षाची तयारी असणे स्वाभाविक आहे. या प्रश्नावर तिसऱ्या पक्षाने बोलणे योग्य नाही.

मुदतवाढीचं गुऱ्हाळ सरकार किती महिने चालू ठेवणार?

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाशी, तर उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाशी संवाद साधून त्यांना काय आश्वासन दिले, हे आम्हाला माहिती नाही? यावर सरकारने बऱ्याच चर्चा केलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने या निर्णयापर्यंत यायला हवं.

सरकार निर्णय घेण्यात सक्षम आहे. त्यांनी विरोधकांना बोलावून याबाबत काय निर्णय घेतला, हे सांगितले पाहिजे. चर्चा आणि मुदतवाढीचं गुऱ्हाळ सरकार किती महिने चालू ठेवणार, असा सवालही जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या ‘सगे सोयरे’च्या ‘जीआर’बाबत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT