Kolhapur, 22 March : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीचं मला काही विशेष वाटत नाही. जयंतराव हे काही लढाऊ माणूस नाहीत, त्यांची लढण्याची क्षमता नाही. ते सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत आणि सत्ता ही फक्त आणि फक्त आमच्यासाठीच आहे, अशी त्यांची धारण आहे. सत्तेसाठी कितीही लाचार व्हावं लागलं तरी होण्याची त्यांची तयारी आहे, अशा शब्दांत आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार-जयंत पाटील भेटीवर टीकास्त्र सोडले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार जयंत पाटील यांची पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बंद खोलीत चर्चा झाली. त्यावरून राज्याच्या राजकारणात काहूर माजलं आहे. त्या भेटीवर प्रतिक्रिया देताना पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या सत्तेच्या जवळ येण्याबाबत भाष्य केले आहे.
आमदार पडळकर म्हणाले, जयंतरावांची परिस्थिती सर्वांना माहिती आहे. जयंतराव हे काही लढाऊ माणूस नाहीत, त्यांची लढण्याची क्षमता नाही. संघर्ष आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांचा काही संबंधच नाही. थेट वडिलांच्या रिक्त जागेवर आल्यामुळे आयुष्यात त्यांची आणि संघर्षाची ओळखच नाही, त्यामुळे ते सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत, हे फक्त मीच बोलतो आहे, अशातील भाग नाही. राज्यातील सर्वसामान्य माणसालाही हे माहिती आहे.
जयंत पाटील यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ते आता पूर्णपणे शरण आले आहेत, ही त्यांची भूमिका लोकांना कळालेली आहे. त्यामुळे ते कोणाकडे येतील, कसे येतील, हा माझा विषय नाही, कारण मी भारतीय जनता पार्टीचा वरिष्ठ नेता नाही. सरकार आल्यानंतर विरोधी पक्षाकडेही लोक अपेक्षेने बघत असतात. जे लोक मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून मिरवत होती, त्या लोकांची जबाबदारी असते की, सरकार येतं, तेव्हा विरोधात भूमिका मांडायलाही लोकं लागतात, असेही गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी नमूद केले.
आमदार पडळकर म्हणाले, राज्यातील जनतेला २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत दिलं होतं. ते बहुमत चोरण्यात आले, त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. त्यामध्ये जयंत पाटीलही होते. पण, देवेंद्र फडणवीस रडत बसले नाहीत, त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी होती. तेव्हा कोविडचा काळ होता. मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नव्हते, पण फडणवीस संपूर्ण राज्यात फिरत होते.
विरोधी पक्षनेते असतानाही फडणवीसांनी अत्यंत प्रभावी भूमिका सरकारकडे मांडली. सरकारकडून काही गोष्ट होत नव्हत्या, त्या फडणवीसांनी सरकारच्या मानगुंटीवर बसून करून घेतल्या. आता सरकारच्या विरोधात कोण बोलतंय का. जरा विरोधात बोललं की लगेच मागं सरकतात. राज्यातील जनतेची बाजू सरकारकडे मांडेल असा सक्षम माणूसच विरोधकांकडे राहिलेला नाही, असा दावाही पडळकर यांनी केला.
महिला थेट लाभ देण्याच्या योजनेवर कर्नाटकात बजेटच्या ४७ टक्के, तेलंगणात ३३ टक्के खर्च करण्यात येत होता. महाराष्ट्रात मात्र लाडकी बहिण येाजनेवर बजेटच्या सात टक्के खर्च होतो आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना आणली आहे, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.