Dr. Babasaheb Deshmukh-Jayant Patil-Dr. Aniket Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil Complaint : ‘पवारसाहेब, तुम्हीपण सांगोल्यात नको त्या लोकांना मोठं केलं’; जयंत पाटलांचा रोख कुणाकडे?

Vijaykumar Dudhale

Sangola News : सांगोला तालुका हा गणपतराव देशमुखांचा आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे. पवारसाहेब, तुम्हीपण सांगोल्यात नको त्या लोकांना मोठं केलं. त्यांनी आमचा प्रॉब्लेम करून टाकलाय. आता एवढीच विनंती आहे की, आमच्या लोकांना सोडू नका. आम्ही आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहोत, यात बदल होणार नाही, असा शब्द शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी दिला. ('Pawarsaheb, you also gave power to unwanted people in Sangola': Jayant Patil)

सांगोला येथील गणेशरत्न कृषिप्रदर्शनात जयंत पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते. जयंत पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख ही राम-लक्ष्मणाची जोडी आबासाहेबांपेक्षाही सांगोल्याचा अधिक विकास करेल. दोघेही माझ्या संपर्कात असतात. शेकापचे लोक माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीत, याची मला खात्री आहे. दोन्ही भाऊ मोठे होतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाबासाहेब हे शांत आहेत. डॉ. अनिकेत देशमुख हे चपळ आहेत. तो मला आवडतो. त्यांनी उत्कृष्ट भाषण केले. सांगोलेकरांना सांगतो, की हे दोन डॉक्टर आहेत आणि मी कंपाउंडर आहे. पण या दोन्ही डॉक्टरांना ठीक करण्याचे काम मी करू शकतो. या तरुणांना उज्ज्वल भवितव्य आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सांगोला तालुक्यात पाणी आणण्याची सुरुवात शरद पवार यांच्या माध्यमातूनच झाली होती. उद्याचा सांगोला हा वेगळा असेल. लोक गणपतराव देशमुख यांना विसरणार नाहीत. शेतीमाल प्रक्रिया उद्योग आपल्याला सांगोल्यात आणावे लागतील. अनिकेत देशमुख यांच्याकडून आमच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. तुमच्या कामामुळे मी प्रभावित झालो आहे. या देशात जे घटनाबदलाची भाषा करतात त्यांचा विरोध आपल्याला करायचा आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफी आणि दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजना शरद पवार यांनी सुरू केली, हे मी कधीही विसरणार नाही. माझ्या कोकणात आणि विशेषतः दुष्काळी सांगोला तालुक्यात पहिल्यांदा रोहयोतून फळबाग लागवड झाली. फळबाग लागवडीच्या माध्यमातून पवारांनी सांगोला तालुका हिरवागार केला, हे तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही. या योजनेमुळे आमच्या कोकणातील सातशे किलोमीटर डोंगर हिरवेगार झाले आहेत.

चुका चिक्कार झाल्या, टीकाही भरपूर केली. पण, आम्ही शरद पवार यांची साथ कधी सोडली नाही. पवारांचा शब्द आम्ही कधी खाली पडू दिला नाही. आमचं नुकसान झाले तरी चालेल पण आम्ही पवारांना कधी सोडले नाही. ते शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे नेते आहेत. मी आमदार जितेंद्र आव्हाडांना धन्यवाद देईन. ते म्हणाले की, ‘मी शरद पवारांमुळे रायगडमध्ये मूर्खपणा केला.’ तरहीही पवारांचा शब्द आमच्या कुटुंबाने (मीनाक्षी पाटील आणि मी) कधीही खाली पडू दिला नाही. अकरा सदस्य असताना आणि आमचे २४ सदस्य असताना मी त्यांना (सुनील तटकरे) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. आम्ही केवळ पवारांच्या आदेशामुळे हे केले. ते टाटा करून गेले आणि आम्ही तुमच्यासोबतच राहिलो. पवारांचे संबंध हे पक्षाच्या पलिकडचे आहेत. त्यामुळे मी अनिकेतला धन्यवाद देतो की, या कार्यक्रमाला पवारांशिवाय दुसरा लायक माणूस नाही. आजही कृषिमंत्री म्हटलं की पवार म्हटलं जातं, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

ते म्हणाले, कठीण काळात जो बरोबर राहतो, त्याला काळ कधीही विसरत नाही. आज पवारांचा कठीण काळ आहे. पुढचा काळ उज्ज्वल आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्यासोबत कायम आहेत. त्यांच्या आग्रहाखातरच मी इंडिया आघाडीच्या कमिटीवर आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही देशभरात मान आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT