Prakash Ambedkar
Prakash Ambedkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील तिजोरी लुटायचीय...

अमित आवारी

अहमदनगर - वंचित बहुजन आघाडीचा तीन दिवसीय मेळावा शिर्डी येथे सुरू आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) आज शिर्डी येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशातील विविध राज्याच्या निवडणुका, राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार घेणे, ओबीसी आरक्षण या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व महाविकास आगाडीवर जोरदार टीका केली. ( Prakash Ambedkar said, Mahavikas Aghadi wants to loot the coffers of Maharashtra ... )

प्रकाश आंबेडकर म्हणाले, घटनेची पायमल्ली करण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहेत. ही राज्यघटना काँग्रेसच्या कालावधीत निर्माण झाली. आज दुर्दैवाने हीच काँग्रेस घटनेची पायमल्ली करत आहे. काँग्रेस पक्षाला आपल्या इतिहासाची व वारश्याची लाज असेल तर ते घटनेची पायमल्ली करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेने बरोबर राहणार नाहीत. भाजपच्या घटना बदलण्याच्या भूमिकेवर एक शब्दही काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी अथवा वर्किंग कमिटीने काढलेला नाही. राष्ट्रवादी व शिवसेनेने घटनेची पायमल्ली करत असताना काँग्रेस त्यांच्या बरोबर राहिली तर निष्कर्ष असा निघतो की राष्ट्रवादी व शिवसेनेच्या भूमिकेशी काँग्रेसवाले ही सहमत आहेत. त्यांनाही ही राज्य घटना बदलून पाहिजे, असे आम्हाला वाटते.

ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाला आमचे सांगणे आहे की घटनेने राज्य निवडणूक आयोगाला नियम घालून दिले आहेत की, जुने सभागृह बरखास्त होण्या अगोदर नवीन सभागृह गठीत झाले पाहिजे. हे बंधन व ही जबाबदारी महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोगाची आहे. ती जबाबदारी घटनेची आहे. त्यांनी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. मंत्रीमंडळाने दिलेला निर्णय त्यांना बंधनकारक नाही. विधीमंडळात मंजूर कायदाही त्यांना बंधनकारक नाही. त्यांना निवडणुका जाहीर करणे, प्रभाग पाडणे ही जबाबदारी घटनेने निवडणूक आयोगाला दिली आहे. म्हणून त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी, अशी विनंती आम्ही मुख्य निवडणूक आयोगाला करत आहोत.

त्यांना अजून महाराष्ट्रातील तिजोरी लुटायची आहे. म्हणून त्यांचा नगरपालिका, महापालिकेंवर डोळा आहे. संधी त्यांना मिळाली. प्रशासका मार्फत आपल्याला लुटता येते. म्हणून त्यांनी लुटारूचे कामकाज सुरू केले आहे. हा प्रयोग देशाच्या एकतेला हाणीकारक ठरू शकतो. निवडणुका म्हणजे पाच वर्षांनी नवीन लोक निवडून देण्याची संधी तुम्ही गमावता आहात. साचलेपणा आला की त्याच्यामध्ये किडे पडायला सुरवात होते.

ओबीसींना सांगायच मला..

ओबीसी आरक्षणाच्या तिढ्या बाबत प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की, ओबीसींना सांगणे आहे की चोरांच्या नादी लागू नका. सर्वौच्च न्यायालयाने ओबीसीचे आरक्षण काढले असा दुष्प्रचार सुरू आहे. सर्वौच्च न्यायालय एवढेच म्हणते आहे की, तुम्ही ज्यांना आरक्षण द्यायचे त्यांना खरेच आरक्षण पाहिजे का याची माहिती सादर करा. मात्र भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने मंडल कमिशनने दिलेल्या यादीत अनावश्यक घुसळण केली आहे. ही अनावश्यक घुसळण केली अथवा नाही हे सर्वौच्च न्यायालयाला पाहिजे आहे. जोपर्यंत योग्य माहिती दिली जात नाही तो पर्यंत ओबीसी आरक्षण लागू करण्याला मनाई केली आहे. हा मनाई हुकूम आहे. त्यांनी आरक्षण रद्द केलेले नाही. ओबीसीनी या चारही पक्षांना मतदान करायचे नाही हा निर्णय झाला पाहिजे. श्रीमंत मराठा आरक्षणवादी नाही. भाजप सारखा आरक्षण विरोधी आहे. आरक्षणवाद्यालाच मतदान दिले तर सर्वौच्च न्यायालयाला हवी असलेली माहिती मिळू शकते. व आरक्षण पुन्हा सुरू होऊ शकते.

ओबीसी समाजाला आमचे आवाहन आहे की, या चोरांच्या सरकारने गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचे वाटोळे लावले आहे. तसेच ते ओबीसी आरक्षणाचे वाटोळे करत आहेत. निवडणुका होऊ द्या. ओबीसींनी सत्तेत या सत्ता हातात घेऊन सर्वोच्च न्यायालयाला जी माहिती पाहिजे ती माहिती सादर करून पुन्हा आरक्षण सुरू करून घ्या. या चोरांच्या अपप्रचाराच्या नादी लागू नका, असे प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी समाजाला आवाहन केले.

विविध राज्याच्या निवडणुकांचा कल

वंचित बहुजन आघाडी व एमआयएमला भाजपची बी टीम असल्याचे सांगितले जात आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, समाजवादी पक्ष व भाजपमध्ये सरळ लढत होत असताना काँग्रेसने का निवडणूक लढविली. मग आम्ही असे म्हणायचे का काँग्रेसमधील अध्यक्षा पासून अनेक माजी मंत्री चौकशीत अडकले आहेत, म्हणून भाजपने त्यांना निवडणूक लढायला सांगितली असा आरोप आम्ही केला तर. राजकीय पक्षांची नोंदणी झाली की त्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. तो अधिकार सर्व पक्षांना समान आहे. हे आरोप प्रत्यारोप चालू आहेत ते योग्य नाहीत. येथे वेगवेगळ्या विचारसरणीची माणसे आहेत. त्यांना वेगवेगळ्या विचारसरणी समुहाला त्याचा पक्ष कुठला हे ठरविण्याची संधी त्याला मिळते. हार-जीत हा लोकशाहीतील एक भाग आहे. मात्र मतांचे प्रदर्शन हे लोकशाहीतील सर्वात मोठे हत्यार आहे. त्याला चुकीच्या दिशेने नेण्याचे जे कारस्तान देशात चालले आहे. ते देशातील लोकशाही संपविण्याचे काम करत आहेत. शासनकर्त्या वर्गाला प्रत्येक विचारांच्या मतांची दखल घ्यावी लागते.

जनतेलाच वाटते की त्यांनी कोण्या एकाच्या हातात सत्ता द्यायची नाही. पैसे वाटप करा, धर्माचे राजकारण करा, जे काही करायचे ते करा. जनता कोणा एकाच्या हातात सत्ता द्यायला तयार नाही. मिश्रीत सरकार निर्माण झाली पाहिजेत असा जनतेचा कौल आहे. लोकांना कळाले कोणालाही निवडून दिले तरी चोरांचेच भागते म्हणून एका चोराला मते देण्या ऐवजी मिश्र मतदान होत आहे. म्हणजे एकमेकांच्या चोरीवर अंकुश ठेवतील असा तोडगा जनतेने काढलाय असे मला एक्झिटपोलमधून दिसत आहे.

राजकारणात तत्त्व कुठेही राहिलेले नाहीत. त्यामुळे राजकारणात आयाराम गयाराम वाढले आहेत. कुटुंबातील माणसाला विविध पदे, उमेद्वारक्या यातून तत्त्व शुन्य राजकारणाला सुरवात झाली असे मी मानतो. ज्या ज्या पक्षातील कार्यकर्त्यांना लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी मेहनत करावी लागत होती. लोकांची कामे करावी लागत होती. स्वतःला सिद्ध करावे लागत होते. मग कुठे लोक त्यावर विश्वास ठेवायचे. आता ती पद्धत संपली. आता लोकशाही संपली कुटुंबशाही आली आहे. ही कुटुंबशाही सर्वच पक्षात आहे. त्यामुळे लोकांसमोर विकल्प नाही. म्हणून लोक म्हणतात तू किती देतोय ते सांग. त्यांचाही एक दिवसाचा गरिबी हटाओचा कार्यक्रम होतो. ज्यात लहान पक्ष, सिन्सिअर कार्यकर्ते यांचे बळी जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

संजय राऊत व नारायण राणेंना टोला

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदे संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले, राऊत यांनी मागील पत्रकार परिषदेत म्हंटले होते. की ईडीच्या अधिकाऱ्याने करोडो रुपये कमावेले असे सांगितले होते. त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या कुठल्या अधिकाऱ्याने किती पैसे कमविले आहेत. याची त्यांनी माहिती द्यावी परंतु त्याच बरोबर ती माहिती त्यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात सादर करावी. म्हणजे कायद्याची अंमलबजावणी होईल. भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला शिक्षा होऊ शकते. ते पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारी पाठविण्यापेक्षा न्यायालयात याचिका का दाखल करत नाहीत. मात्र न्यायालयीन चौकशी पाच वर्षे चालू नये. या चौकशीला वेळेची मर्यादा ठेवली जावी.

नारायण राणे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ज्येष्ठ आहेत. त्यांनी सुशांतसिंह राजपूत व दिशा सालियान बाबत गंभीर आरोप केले. त्यांच्या जवळ असलेले पुरावे त्यांनी लोकांसमोर आणावेत अथवा न्यायालयात सादर करावेत. लोक या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळाला राजकारण म्हणून पहायला लागले आहेत. ज्यांचा जीवगेला त्यांच्या कुटुंबाकडे कोणीही पहात नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसवाल्यांना चर्चेसाठी बसायला तयार असाल तर आम्ही येऊ असे सांगितले होते. मात्र काँग्रेसकडून त्याचे उत्तर आलेले नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व नेत्यांना श्रीमंत मराठ्यांची साथ सोडून बहुजनांबरोबर यायचे दिसत नाही. त्यामुळे टीकेचा सुरू त्यांनी ठेवला आहे, असा आरोपही आंबेडकरांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT