Sahyadri Sugar Factory Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण देणार पवारांच्या नेत्यांना धक्का; सह्याद्रीच्या निवडणुकीत संयुक्त पॅनेल उभा राहणार

Sahyadri Sugar Factory Election : माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. निवडणुकीत शह-कटशहाचे जोरदार राजकारण रंगले आहे, त्यातून साताऱ्याचे राजकारण धारदार होताना दिसत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Karad, 21 March : माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. निवडणुकीत शह-कटशहाचे जोरदार राजकारण रंगले आहे, त्यातून साताऱ्याचे राजकारण धारदार होताना दिसत आहे. प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कोर्टात अर्ज वैध ठरल्यानंतर कऱ्हाड उत्तरचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात समविचारी लोकांशी आणि नेत्यांना बरोबर घेऊन संयुक्त पॅनेल उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण घेतील, असे म्हटले आहे, त्यामुळे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत पृथ्वीराजबाबा हे शरद पवार यांच्या पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांना घेणार, हे आता स्पष्ट होत आहे.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Sahyadri Sugar Factory election) स्थानिक राजकारणामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत एकमेकांचे मित्र समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेही एकमेकांना आव्हान देत आहेत. सह्याद्री साखर कारखाना हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आतापर्यंत होता. आता बाळासाहेब पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय पॅनेल उभे राहण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांना पराभूत केले, त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या ‘टॉनिक’मुळे घोरपडे यांनी सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीतही पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचीही साथ मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.

कऱ्हाड उत्तरचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्यासह दहा जणांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आले होते. मात्र, प्रादेशिक साखर सहसंचालकांनी एक अर्ज वगळता नऊ जणांचे अर्ज वैध ठरविले आहेत, त्यानंतर काँग्रेस नेते थोरात यांनी बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात पॅनेल उभारण्याचे रणशिंंग फुंकले आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण घेतील, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्य शेतकरी सभासदांना सह्याद्री कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांकडून न्याय दिला जात नाही. मी निवडणुकीला उभा राहणार नव्हतो. पण, सुमारे दोन हजारांहून अधिक सभासदांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटाने केला. मी तो मुद्यावर लढून मी त्या सभासदांना न्याय मिळवून दिला, त्यानंतर सभासदांनीच मला अर्ज भरायला सांगितले.

समविचारी पक्ष आणि नेत्यांशी चर्चा सुरू आहे. कारखान्याच्या निवडणुकीत संयुक्त पॅनेल होईल, अशी आशा आहे, त्याबाबतचा अंतिम निर्णय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण घेतील, असे निवास थोरात यांनी सांगितले.

निवास थोरात म्हणाले, सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संयुक्त पॅनेल उभारण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. माघारीनंतर उद्या शुक्रवारी दुपारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुढील दोन दिवसांत आम्ही लोकांसमोर आणि सभासदांसमोर जाऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT