Kalicharan Maharaj
Kalicharan Maharaj Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kalicharan Maharaj News : राजाला चोर म्हणणं चुकीचं; राहुल गांधींना आपल्या कुकर्माची फळे मिळाली : कालीचरण महाराजांकडून कारवाईचे समर्थन

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : राहुल गांधींना (Rahul Gandhi) आपल्या कुकर्माची फळे भेटली आहेत. राजाला चोर म्हणणं चुकीचंच आहे. जग ज्यांना डोक्यावर घेतंय, त्यांना चोर म्हणणं चुकीचं आहे, अशा शब्दांत कालीचरण महाराज यांनी गांधी यांच्यावरील न्यायालयाच्या कारवाईचे समर्थन केले. (Rahul Gandhi got the fruits of his misdeeds : Kalicharan Maharaj)

कालीचरण महाराज हे आज सोलापुरात आले होते. त्यांनी रूपाभवानी मातेचे दर्शन घेतलं. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला आपल्याला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, राजनीती करणारे आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे आजच्या काळातील राजाच आहेत. माझी भाषा जुनी जरी असली तरी आधुनिक पद्धतीतले ते राजाच आहेत.

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले की, चोर आहे हे सिद्ध झालं तर त्याला अर्थ आहे. जी गोष्ट सिद्धच झाली नाही, पण, घणाघाती आरोप केले जातं आहेत. त्यामुळं अनेक जणांनी मानहानीचा दावा केल्याने त्यावर न्यायालयाने राहुल गांधी यांना दंड दिला आहे. तुम्ही जर निकालाला चुकीचं म्हणतं असाल तर तुम्ही न्यायालयाचा अपमान करत आहात.

जे हिंदूहिताचं काम करतात, त्यांच्यावर आरोप होतच असतात. अशा वक्तव्यांकडे हिंदूहिताचं काम करणाऱ्यांनी दुर्लक्ष करावं. आमच्यासारखी लोक हिंदू हिताचं काम करणाऱ्यांच्या माग वोट बँक डेव्हलप करण्याचं काम करत आहेत. यातच हिंदुत्वाच कल्याण आहे. धर्माचं कल्याण आहे. राष्ट्राचं कल्याण आहे आणि हिंदूराष्ट्राचं कल्याण आहे. भारतामध्ये हिंदूंच परिपूर्ण ध्रुवीकरण अजूनही झालेलं नाही. हिंदू अजूनही सडक्या जातीवाद, वर्णवाद आणि भाषावादात अडकून पडलेला आहे. परंतु आमच्यासारखी लोक जातीवाद, वर्णवाद, प्रांतवाद, भाषावाद तोडण्याचा प्रयत्न करत आहोत. हिंदू एक झाल्याबरोबर कट्टर व्होट बँकेत हिंदूंच रूपांतर होईल आणि ते हिंदू हिताचे काम करणाऱ्या राजांना सत्तेत बसवतील. धर्मराज्य आणि रामराज्याची स्थापन करतील, असेही कालीचरण म्हणाले.

कडू आणि तिखट तोंडाची लोक राजकारणात यशस्वी होत नाहीत. त्यामुळं कडू आणि तिखट तोंडाचा कालीचरण राजकारणात कसा सक्सेस होईल? असे उत्तर आपल्या राजकीय प्रवेशाच्या प्रश्नावर कालीचरण यांनी दिले. ते म्हणाले की, भाजप २०२४ मध्ये सत्तेत येवो, अशी अशा आहे.

महाराष्ट्र सरकारची कामगिरी स्तुत्य आहे. माहीम दर्गाचे अवैध बांधकाम हटवण्यात आले पाहिजे, त्यामुळे देशाची प्रगती होईल, यात काही शंका नाही. राज ठाकरेंची भूमिका ही स्तुत्य आहे. राज ठाकरेंच्या अशा कामामुळे धर्मजागृती होत आहे. शिंदे सरकारचंही काम अतिशय उत्कृष्ट आहे. राज ठाकरे जसं धर्महिताचे मुद्दे उचलत राहतील, तसं त्यांना सर्व हिंदूंचा पाठिंबा मिळत राहील. लव्ह जिहाद कायदा, गोवंश हत्या बंदी कायदा झाला पाहिजे. लोकसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे. हिंदू मुसलमान लग्न अमान्य असलं पाहिजे, अशी मागणीही कालीचरण महाराज यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT