Ram Shinde Vs Rohit Pawar
Ram Shinde Vs Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राम शिंदेचे रोहित पवारांना आव्हान : राजीनामा द्या, होऊन जाऊ द्या निवडणूक

सरकारनामा ब्युरो

Ram Shinde Vs Rohit Pawar : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्ते कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे विधानपरिषद आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी केला होता. यावर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी राम शिंदेंवर टीका केली होती. या टीकेला राम शिंदे यांनी उत्तर दिले. कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

राम शिंदे म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मला मिळाली. एक आमदार हा तीन ते साडेतीन लाख मतांनी निवडून येतो. तसे 30 आमदारांनी मला मते दिली. म्हणजे मी किती मतांनी निवडून आलो हे तुम्हीच सांगा. याला मागचे दार म्हणतात का? 2024च्या निवडणुकीचा लोक विचार करत आहेत. मी म्हणतो आताच निवडणूक होऊ द्या. मीही राजीनामा देतो. तुम्ही राजीनामा द्या. होऊन जाऊ द्या निवडणूक, असे आव्हानच त्यांनी आमदार रोहित पवार यांना दिले.

ते पुढे म्हणाले की, लोकांच्या मनात काय चालले आहे हे मी रोज ऐकतो. लोकांची मने जिंकण्यासाठी मन खूप मोठं लागतं. मला गेल्या निवडणुकीपेक्षा दहा हजार मते वाढली. हे काही कमी नाही. लोक म्हंटले डिपॉजिट जाईल. विरोधक म्हंटले उभे राहिले हेच मोठं. मात्र पूर्वीपेक्षा दहा हजार मते जास्त घेतली, असे त्यांनी सांगितले.

ज्यांनी पाणी देऊ असे सांगितले त्यांनी सत्तेत आल्यावर तीन वर्षे पाण्या वाचून माणसे मारली. तुम्ही वरच्या बाजूचा माणूस निवडून दिल्यामुळे कुकडी प्रकल्पाला खाली पाणी सोडण्याची कोणाची हिंमत आहे का? पुण्यातला माणूस निवडून दिल्यामुळे तीन वर्षे मतदारसंघात पाणी आले नाही. भाषणात बोलायचं वेगळं, फेसबुकला टाकायचं वेगळं, करायचं वेगळं, असा धंदा आपण केला नाही. लोक हीच माझी संपत्ती आहे. त्यामुळे माझ्या मागे ईडी आणि सीबीआय लागत नाही, अशी टीका त्यांनी केली.

मी दहा वर्षे मतदार संघाच्या विकासासाठी काम केले. मध्ये अडीच वर्षे खंड पडला मात्र मी काही कमी नाही. कधी नव्हे ते कर्जत-जामखेडला विधानपरिषदेचे आमदारपद मिळाले. काही लोकांना कळालच नाही की हा मधेच आमदार कोठून झाला. माझे नाव राम असल्यामुळे जास्त दिवस वनवासात राहण्याची गरज लागली नाही. अडीच वर्षांतच पुन्हा आलो. नुसता आलो नाही तर सरकार घेऊन आलो, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

माझे बरेच कार्यकर्ते दबावामुळे इकडे-तिकडे पळाले. मी म्हणायचे घाबरू नका आपले भविष्य उज्ज्वल आहे. ज्यांना धीर नव्हता ते पळाले. मी गद्दारांना थारा नाही असे म्हंटलो नाही आणि म्हणणारही नाही, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक गणेश मराळे यांनी केले. बजरंग कायगुडे यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी विलास कायकुडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, गणेश पालवे, तात्या माने, धनंजय मोरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT