karad political Leader Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ZP Election : आमचं वय संपणार आहे...पुढे कधी संधी मिळणार?; इच्छुकांच्या आक्रमक प्रश्नांनी नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली

Karad Political News : कऱ्हाड तालुक्यातील झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत ३२३ उमेदवार पात्र ठरल्याने बंडखोरी वाढली आहे. मतविभाजन टाळण्यासाठी पक्ष नेते अपक्षांची मनधरणी करत असून निवडणूक चुरशीची होणार आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 24 January : कऱ्हाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२ आणि पंचायत समितीच्या २४ जागांसाठी ३२३ उमेदवार छाननीत पात्र ठरले आहेत. त्यामुळे नेत्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडाचा झेंडा हातात घेतला आहे, तर काहींनी पक्षच बदलला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान मतविभाजनाचा फटक्यामुळे उमेदवाराला होणारा धोका टाळून अपक्षांना थोपवण्याठी नेत्यांकडून रात्रीचा दिवस करुन त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरु आहे. त्याला कितपत यश येणार, हे मंगळवारीच समजेल.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आता नेतेही सक्रीय झाले आहेत. कऱ्हाड (Karad) तालुक्यातील प्रत्येक गटांत आणि गणांत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते, त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आमचे वय संपणार आहे, आता आरक्षणाने संधी मिळणार आहे, पुढे किती वर्षांनी मिळेल सांगता येत नाही, आत्ता नाही तर परत कधीच नाही अशी कारणे देत प्रत्येक इच्छुकाने आपल्या नेत्यांकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

उमेदवारांची संख्या जादा असल्यामुळे मतविभागणीचा फटका उमेदवाराला बसू नये, यामुळे प्रत्येक गटात दुरंगी लढत व्हावी, यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. नेत्यांकडून रात्रीचा दिवस करुन प्रयत्न सुरु आहेत. मात्र मसूर, कोपर्डे हवेली, तांबवे, येळगाव, कार्वे या गटासह अन्य काही गणातील पक्षाशी एकनिष्ठ राहूनही इच्छुकांना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन अधिकृत उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांचा स्थानिक नेतृत्वावर रोष वाढला असून त्यांनी बंडाचा झेंडा हातात घेतला आहे, त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

इच्छुकांच्या अटींमुळे नेतेमंडळींची अडचण

जिल्हा परिषद व पंचायत समितीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवारचा एकच दिवस मिळणार आहे. त्यामुळे नेत्यांना अपक्षांच्या मनधरणीसाठी उद्या आणि सोमवारी मोठी कसरतच करावी लागणार आहे. अनेक इच्छुकांनी काही नियम व अटी नेत्यांसमोर ठेवल्या आहेत तर काहींनी पुढील काही कामे व्हावी, अशी अट्ट घातली आहे. नेत्यांकडूनही काहींना भविष्यात विविध ठिकाणी संधी देण्याचेही आश्वासन देण्यात येत आहे. त्याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

निष्ठावंतांवर पक्ष बदलण्याची वेळ

येळगाव गटातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ॲड. आनंदराव पाटील-उंडाळकर यांनी तर थेट भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याशी जवळीक साधली. त्यांना भाजपने पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे एकनिष्ठ असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे पाटील यांनी समर्थकांच्या मागणीनुसार अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.

भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ यांनाही कोपर्डे गटातून उमेदवारी देण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर सुपने गणातून भाजपचे गणेश पाटील यांना पंचायत समितीची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी घेतली आहे. अन्य गटातीलही राजकीय समीकरणे येत्या दोन दिवसांत बदतील, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT