Sadabhau Khot
Sadabhau Khot sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सदाभाऊ खोत म्हणाले, दोनच माणसं व्यवस्थित वाढत असतील तर 40 माणसांची गरज काय?

सरकारनामा ब्युरो

सांगली - शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची शेतकरी नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी मुक्तकंठाने स्तुती केली. तसेच राज्यात दोनच माणसं व्यवस्थित वाढत असतील तर 40 माणसांची गरज काय?, अशी कोपरखळीही त्यांनी शहाजी पाटलांना मारली. सांगलीतील एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. ( Sadabhau Khot said, if only two people are growing properly, what is the need for 40 people? )

सदाभाऊ खोत म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विकासकामांचा मोठा डोंगर उभा केला. त्या काळात रस्ते डांबरीकरण केले. पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिली. महाविकास आघाडीने या योजनांना स्थगिती दिली. त्या योजनांना आता आपण गती देणार आहोत, कारण सरकार आपले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, आपल्या सरकारमध्ये शहाजीबापूंचे तर ओकेच झालं. पण बापू आमच्याकडे जरा ध्यान ठेवा. तुम्ही पहिल्या पंगतीत आहात. सामान्य तळागाळातील माणसे वर मंत्रिमंडळात गेली पाहिजेत. राज्यात परिवर्तन झाल्या बरोबर पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. मार्केट कमितीत शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला. 2019च्या कर्जमाफीत सरसकट सर्वांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. असे ऐतिहासिक चांगले निर्णय घेतले, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस ही दोनच माणसे चांगले निर्णय घेत आहेत. त्यांनी जनतेला व्यवस्थित पोटभर जेवू घालण्याचा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून ते कामाला लागले. मला वाटतं दोनच माणसं चांगले काम करत आहेत. दोनच माणसं व्यवस्थित वाढत असतील तर 40 माणसांची गरज काय?, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

शहाजीबापू तुमच्या सारखा माणूस कितीही उच्चपदावर गेला. तरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून हा सदाभाऊ खोत तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचल.कारण तळागाळातील माणसं तिथं पर्यंत गेली पाहिजे. सामान्य माणूस सत्तेच्या व्यासपीठावर असला पाहिजे. सामान्य माणूस ज्या गरिबीतून वर आलेला असतो ती गरिबी नष्ट करायची अशी भावना त्यांच्या मनात असते.

बापूंचा प्रवास मोठा आहे. कारण तो प्रवास विमानातील आहे. मात्र आता तो गाडीतून करावा लागत आहे. बापू हे सुरत ते गुवाहाटी तेथून गोवा. दऱ्या खोऱ्या, डोंगरात वाघ जावा असे ते गोव्याच्या समुद्र किनारे उभे राहिले. आता हा वाघ महाराष्ट्रातील सरकार हलवून आला आहे. एवढी मोठी महान व्यक्ती आपल्याला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभली आहे. तुम्ही निश्चितच मंत्रिमंडळात असाल. तुम्ही हेलिकॉप्टरने इकडे यालं. येता एक दोर घेऊन या त्या दोराला धरून मी येतो, असा विनोदही त्यांनी केली.

सामान्य कुटुंबातील माणूस, रांगडी भाषा, सातसमुद्रापलिकडे गेले. हीच अवस्था गोपीचंद पडळकर यांचीही. पडळकर एखाद्या प्रश्नावर उभे राहिले तर जसा देव अंगात यावा तसा गडी नाचायला लागतो. सरकार नसल्यावर लई वाईट राव. मी मंत्री होतो. लोक उठवायला यायची. सहालाच एक किलोमीटर रांग लागायची. जसे सरकार गेले तेव्हा पासून मी एकटाच. धान्याची कणसं आल्यावर शेतात पक्षी यावेत आणि पीक काढणी झाल्यावर शेतात चिटपाखरूही दिसू नये अशी स्थिती झाली. काही गोरगरिब राहिले, असे त्यांनी सांगितले.

सरकार असताना सामान्य माणसाची कामे केली. सरकार गेल्यावरही सामान्य माणसाची नाळ आम्ही तुटू दिली नाही. म्हणून मी, गोपिचंद पडळकर सामान्य माणसासाठी सभागृहात बसलो. विविध प्रश्न मांडले. एसटीच्या प्रश्नावर लढलो. आमच्या सरकारमध्ये एसटी कर्मचारी सुखी समाधानी होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT